औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांत रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा; पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली.
शहरातील कचराप्रश्न पाच महिन्यांनंतरही सुटलेला नाही. त्यामुळे बुधवारी नागपूर येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त निपुण विनायक यांच्यासह नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पाच महिने झाले तरी रस्त्यांवरचा कचरा का संपत नाही, असा प्रश्न श्री. बागडे यांनी आयुक्तांना केला. त्यावर आयुक्तांनी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचा कचरा कधी संपणार, याचा रोडमॅप तयार आहे का, निविदा प्रक्रिया कधी संपणार, कचऱ्यावर प्रक्रिया कधीपासून सुरू होणार, याची माहिती जनतेला कळाली पाहिजे. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, एवढे दिवस काय केले, असा सवाल केला.
दोन दिवसांत रोडमॅप तयार करून सादर करा. वेळेवर कामे होत नसतील तर महापालिकाच बरखास्त करण्यात येईल, अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिली.
ई-निविदा विभाग बदलून टाका
गतवर्षी शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दिला होता. आणखी शंभर कोटी देणार होतो; मात्र अद्याप वर्षभरानंतरही तुमची निविदा प्रक्रियाच सुरू आहे. ई-निविदा विभागात असे काम चालते का? तो विभाग बदलून टाका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना केल्या.
|