औरंगाबाद - रेशन दुकानातील धान्याचा काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना आखल्या जात आहेत. शासनाने बायोमेट्रिक्ससह लाभार्थींना धान्य वाटपासाठी इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (ईपीओएस) मशीनद्वारे नियंत्रण आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यामध्ये नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. येथे लाभार्थींना एप्रिलपासून बायोमेट्रिक्सद्वारे धान्य वाटप करण्यात येणार आहे.
जानेवारी महिन्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (ईपीओएस) मशीनद्वारे धान्य वाटप करण्यास सुरवात केली. यानंतर आता राज्यातील सर्वच रेशन दुकानांवर या प्रणालीद्वारे लाभार्थींना धान्य वाटपाचा शासन व प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी तीन टप्प्यात ही प्रणाली राज्यातील सर्वच रेशन दुकानावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर या जिल्ह्याचा समावेश झाला आहे.
या प्रणालीमुळे खऱ्या लाभार्थींना धान्य मिळेल. धान्यासाठी त्याला स्वतःला दुकानात जावे लागणार आहे. या पद्धतीमुळे एका व्यक्तीच्या कार्डवर दुसरा व्यक्ती धान्य घेऊ शकणार नाही. शिवाय कार्डधारकाने कोणत्या तारखेला, किती वाजता, कोणता माल घेतला. रेशन दुकानातून त्याने गहू, तांदूळ, साखर आदी धान्य किती प्रमाणात घेतले, त्याचे बिल किती झाले, अशी सर्व माहिती संगणकात फिड होणार आहे. शिवाय प्रशासकीय अधिकारी कुठेही ही माहिती पाहू शकतील. त्यामुळे काळ्या बाजाराला यातून आळा बसणार आहे.
मशीनही दिल्या
नांदेडमधील 1977 रेशन दुकानांसाठी 1980 ईपीओएस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील 1015 रेशन दुकानदारांनी विविध बॅंकांशी करार करून व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून फॉर्म भरून दिले आहेत; तर लातूर जिल्ह्यात 1350 रेशन दुकाने असून, या सर्व दुकानदारांनी व्यावसायिक प्रतिनिधी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
जिल्ह्याल 1362 ईपीओएस मशीन देण्यात आल्या आहेत. 1 एप्रिलपासून या दोन्ही जिल्ह्यांतील कार्डधारकांना बायोमेट्रिक्सद्वारे धान्य वाटप करण्यात येईल. ईपीओएस मशीनमध्ये खरेदी केलेल्या धान्याचे पेमेंटही एटीएमकार्डद्वारे स्वाइप करून थेट बॅंक खात्यातून पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर वळती करता येणार आहेत.
|