ट्रॅव्हल्स, डिझेल रिक्षांचाही समावेश
औरंगाबाद - कायदेशीर अडचणी दूर करून एक दिवसासाठी शिथिल झालेली जड, मध्यम वाहने, ट्रॅव्हल्स आणि डिझेल रिक्षांबाबत बंदी पुन्हा लागू करण्यात आली. शहरात या वाहनांना दिवसा बंदी राहील. रात्री ही वाहने शहरात येऊ शकतात. यासंबंधीची अधिसूचना पोलिस विभागाने बुधवारी (ता. पाच) काढली.
शहरातील सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने पोलिस विभागाने जड, मध्यम वाहने, ट्रॅव्हल्स व डिझेल रिक्षांना बंदी घातली होती. यासंबंधी अधिसूचना काढल्यानंतर अंमलबजावणी सुरू झाली; परंतु यात कायदेशीर अडचणी दिसून आल्या. तसेच अधिसूचनेसंबधी शासकीय गॅझेटमध्ये नोंद केली नव्हती. ही नोंद करून पोलिस विभागाने नव्याने अधिसूचना काढली. अधिसूचनेनुसार, जड, मध्यम वाहने, डिझेल रिक्षा व ट्रॅव्हल्सना शहरात दिवसा येण्यास मज्जाव राहील.
सकाळी सात ते रात्री अकरा
यात डिझेल रिक्षांना सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत, मध्यम प्रकारची वाहने व ट्रॅव्हल्सना सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत शहरात येण्यास मज्जाव केला आहे. तसेच जडवाहने नेहमीप्रमाणे शहराच्या बाहेरून धावतील. ही अधिसूचना प्रायोगिक तत्त्वावर असून यासंबंधी हरकती, आक्षेप असतील तर पोलिस विभागाला कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
|