हिंगोली - शहर पोलिसांनी एटीएम कार्डावरून फसवणूक करणाऱ्या टोळीतील ओडिशातील एका युवकास पकडल्यानंतर आता चंद्रपूर पोलिसांनी उर्वरित पाच संशयितांना पकडले आहे. त्यामुळे दिल्ली, बिहार आणि ओडिशात काम करणाऱ्या या आंतरराज्य टोळीकडून शंभरापेक्षा अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये या गुन्ह्यांची संख्या अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे.
मास्टर एटीएम कार्डावरील क्रमांक व पिन कोडची माहिती एटीएम केंद्रावर इतर ग्राहकांच्या मागे उभे राहून घेतली जात होती. त्यानंतर ही माहिती दिल्ली येथे पाठवून डुप्लिकेट एटीएम कार्ड तयार करून चोरलेला पिनकोड देऊन पैसे काढून घेण्याचे प्रकार महाराष्ट्रातील अनेक शहरात सुरू होते. याबाबत औरंगाबाद, जालना, हिंगोली, सोलापूर, यवतमाळ, वाशीम, नाशिक शहरात या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले होते. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक मोराळ यांनी अमरावती येथून ओडिशाचा रहिवासी असलेला परितोष तारापद पोदार यास पकडले. त्यासोबत संपूर्ण टोळीचा छडा लागण्यास सुरवात झाली आहे. चंद्रपूर पोलिसांनी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात याच टोळीतील आणखी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
|