जलसाक्षरतेचा पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा

जलसाक्षरतेचा पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा

राज्यात चार ठिकाणी केंद्रांची निर्मिती; जलसेवक, जलकर्मींची फळी तयार करणार
औरंगाबाद - राज्याला गेल्या चार ते पाच वर्षांत सतत भीषण दुष्काळी स्थितीने शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. वापरा योग्य पाण्याचा काटसकरीने वापर करण्यासाठी आणि जलसाक्षरतेसाठी राज्यात चार ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून जलसाक्षरतेचा पाच वर्षांचा तसेच प्रत्येक वर्षांचा प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जाईल. जलजागृती, जलसाक्षरतेसाठी राज्यात जलसेवक, जलकर्मी, जलनायकांची फळी तयार केली जाईल.

राज्यातील उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व नियोजनपूर्वक करण्याची आवश्‍यकता आहे. 2016 मध्ये राज्यात कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुण्यातील यशदा येथे जलसाक्षरता केंद्राची स्थापना केली आहे. याचे विभागीय केंद्र चंद्रपूरच्या वन अकादमी, औरंगाबादचे वाल्मी, अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रबोधिनी येथे राहतील.

जलसाक्षरतेचे प्रशिक्षण
पाण्यासंबंधित काम करणाऱ्या शासकीय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्वक काटकसरीने करण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने राज्यात कायमस्वरूपी जलजागृती अभियान राबविले जाईल. जलजागृतीसाठी विविध उपक्रम तयार करून ते जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केंद्रात केली जाणार आहे.

जलसाहित्याची निर्मिती
राज्य सरकारने पूर्ण झालेले व बांधकामाधीन प्रकल्पांचे जलसाठे, जलसंधारणाची कामे, सिंचन प्रकल्प, लोकसहभागातून पूर्ण झालेल्या योजना, त्यांचा जनमानसावर झालेला परिणाम, पाण्याचे प्रदूषण, उपाययोजना, पाण्याचा फेरवापर यासाठी साहित्य निर्माण केले जाईल. ते जनतेसाठी सहज उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी संकेतस्थळाचासुद्धा वापर केला जाणार आहे.

विभागीय केंद्रात आठ पदे
राज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्र यशदा पुणे येथे राहणार आहे. मुख्य केंद्रात 15 पदे राहतील. तर राज्यातील तीन विभागीय केंद्रांत प्रत्येक आठ पदे राहतील. यामध्ये विभागीय संचालक, विभागीय कार्यकारी संचालक अशी आठ पदे राहतील. यशदा, पुणेमध्ये पुणे, नाशिक आणि कोकण महसूल विभागाचा समावेश आहे. वाल्मी औरंगाबादमध्ये औरंगाबाद महसूल विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रबोधिनीत अमरावती महसूल विभाग, तर वन प्रशासन विकास व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूरमध्ये नागपूर महसूल विभागाचा समावेश करण्यात आला आहे.

जलसेवक, जलकर्मींची फळी
ग्रामस्तर व स्थानिक स्तरावर जलसाक्षरचेचे काम करण्यासाठी जलसेवक राहणार आहेत. याशिवाय विविध स्तरांवर प्रशिक्षण देण्याचा व जलक्षेत्रातील कामाचा अनुभव जलनायक नियुक्त केले जाणार आहेत. राज्यस्तरावर 24, प्रत्येक विभागात आठ असे एकूण 48, जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यात 10, एकूण 340, तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्‍यात 12 प्रमाणे 3 हजार 224 जलनायक राहतील.

अशी राहील कार्यपद्धती
पाच वर्षांचा आराखडा
प्रशिक्षणाच्या गरजांची निश्‍चिती करणे
प्रशिक्षणासाठी विविध प्रारूप निश्‍चिती
जलनायकांची निवड करणे
जलनायक, जलकर्मी, जलसेवक यांना प्रशिक्षण
विभागीय केंद्राच्या प्रशिक्षणाचे नियोजन
कार्यशाळा आयोजित करणे, मार्गदर्शन करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com