कर्जामुळे कुटुंब संपविण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

कर्जामुळे कुटुंब संपविण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

दोन मुलींचा मृत्यू; पत्नी, मुलगा, पुतण्या गंभीर
जरंडी (जि. औरंगाबाद) - नापिकी, कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने भाकरीच्या पिठात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना निंबायती-न्हावी तांडा (ता. सोयगाव) येथे सोमवारी (ता. 20) रात्री घडली. या घटनेतील विषबाधित दोन मुलींचा उपचारादरम्यान जळगावच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे.

निंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड यास महिनाभरापासून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता भेडसावत होती. पाच एकर क्षेत्रावर लावलेल्या कपाशीचे तुटपुंजे उत्पन्न निघाले. कापसाची मिळेल त्या भावात विक्री करावी लागली. त्याच्याकडे रब्बी हंगामासाठी पैसाच नव्हता. मुलांच्या शिक्षणाचीही काळजी होती. या नैराश्‍येतून राठोड याने काल भाकरीच्या पिठाच्या डब्यात विषारी औषध कालवले. पत्नी कावेरीबाई यांनी शेतातून घरी येऊन कुटुंबीयांसाठी स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंब जेवायला बसले असताना राठोड न जेवताच बाहेर गेला. तो अद्यापही परतलेला नाही. रात्री दहानंतर कावेरीबाई (वय 32), मुलगी ज्योती राजू राठोड (13), गोगली राजू राठोड (आठ), मुलगा राहुल राजू राठोड (10), पुतण्या दिनेश दिलीप राठोड (10) यांना उलट्या होऊ लागल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मुलगी ज्योती व गोगली यांचा मृत्यू झाला. राहुल राठोड, दिनेश राठोड व कावेरीबाई राठोड या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com