जायकवाडीत वाढले सहा टक्के पाणी

जायकवाडीत वाढले सहा टक्के पाणी

४० टक्के साठा - धरण भरण्यासाठी ११ फूट पाणी वाढण्याची गरज

जायकवाडी - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात पाणलोट क्षेत्रावरील धरणांतून सोमवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदूर-मधमेश्वरमधून २६ हजार ६६६ क्‍युसेक पाण्याची आवक प्रकल्पात होत असून या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १ हजार ५२२ फूट एवढी आहे. सद्यःस्थितीत धरणाची पाणीपातळी १५१०.६२ फूट एवढी झाली आहे. तर पाणीपातळी मीटरमध्ये ४६०.४३७ अशी असून धरणाचा एकूण पाणीसाठा १७४९.८०८ दलघमी आहे. जिवंत पाणीसाठा १०११.७०२ दलघमी एवढा झाला असून रविवारी (ता. ७) ४० टक्के असलेली पाण्याची टक्केवारी सोमवारी (ता. ८) ४६.६० झाली आहे.

यंदाच्या पावसाळी सत्रातील जूनपासून ते आजपर्यंत धरणाच्या पाणीपातळीमध्ये २३ फूट वाढ झाली असून धरण पूर्णतः भरण्यासाठी फक्त ११ फूट पाण्याची आवश्‍यकता आहे, अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता अशोक चव्हाण, बालचंद अजमेरा, सुभाष हानवते, दत्तात्रय नरके, शाम शेळके, रमेश चक्रे, संतोष चाबूकस्वार यांनी दिली.

२००६ च्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी २००९ मध्ये गोदावरी पात्राच्या बाहेर पाणी पडणार नाही, असे नियोजन केले होते. प्रशासनावरील सर्व प्रकारचा ताण कमी करण्यासाठी आणि गोदाकाठच्या रहिवाशांना व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच नियोजन याहीवेळी करण्यात यावे, म्हणजे पैठण आणि गोदाकाठच्या शेतजमिनी व जवळपास १५० खेड्यांना त्याचा फटका बसणार नाही, अशी मागणी गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे. 

गवतामुळे उपसा घटला

औरंगाबाद - जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तथापि, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनजवळील गवतामुळे पाण्याचा उपसा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. आठ) पाणी उपसा १० एमएलडीने कमी झाला आहे.

महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, माजी सभापती दिलीप थोरात, शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य, भाजपचे गटनेते बापू घडामोडे यांनी अधिकाऱ्यांसह सोमवारी (ता. आठ) जायकवाडी धरणाला भेट देऊन पंपिंग स्टेशनची पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून १५६ ते १६० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. पंपिंग स्टेशनजवळ सध्या पाच पंप सुरू आहेत. पंपिंग स्टेशनजवळील विहिरीतून शहरासाठी पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, सध्या पाणवनस्पती, गवताचा उपशासाठी अडथळा येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून गवत काढण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन पाणबुडे मागवण्यात आले असून गवत काढण्याचे काम सुरूच आहे. याशिवाय उपसा होत असलेल्या विहिरींवर जाळी बसवण्यात आली असली तरी गवताचा अडसर ठरत आहे. यामुळे पाणी उपशाचे प्रमाण घटले आहे. सोमवारी (ता. आठ) १५० एमएलडी पाणी उपसा करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नाशिक व अहमदनगर जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी योग्य नियोजन करून पाणी सोडण्याची प्रक्रिया राबविली असती तर नाशिक ते गंगापूरपर्यंतच्या गोदाकाठच्या जमिनी वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला नसता.

- ॲड. राहुल बाबर, सामाजिक कार्यकर्ते.

गावांची काळजी घेण्याची गरज

सन २००४ ला धरण शंभर टक्के भरले. त्या वेळी गोदावरी पात्रात पाणी सोडले नाही. सन २००५ ते २००८ या चार वर्षात धरण शंभर टक्के भरले होते. २००५ ला गोदावरी पात्रात दीड लाख क्‍युसेक, २००६ ला दोन लाख पन्नास हजार क्‍युसेक, २००७ ला एक लाख चाळीस हजार क्‍युसेक, २००८ ला एक लाख चोपन्न हजार क्‍युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडल्यामुळे पैठण शहरासह गोदाकाठच्या शेकडो एकर जमिनीवरील पिके वाहून गेली. २००९ ते २०११ या कालावधीत अल्पसा पाणीसाठा धरणात होता. त्यामुळे पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्‌भवला नाही. तर सन २०१२ ते २०१५ या चार वर्षात धरण भरले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com