स्वच्छ भारत मिशनमध्ये लातूरची मराठवाड्यात हॅट्‌ट्रिक

स्वच्छ भारत मिशनमध्ये लातूरची मराठवाड्यात हॅट्‌ट्रिक

दोन तालुक्‍यांनंतर तिसरा शिरूर अनंतपाळ तालुकाही पाणंदमुक्त

लातूर - स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्ह्याने मराठवाड्यात आघाडी घेतली आहे. मराठवाड्यात पहिल्यांदा पाणंदमुक्त होण्याचा मान देवणी तालुक्‍याला मिळाला. त्यानंतर दुसरा जळकोट तालुकाही पाणंदमुक्त झाला.

गुरुवारी (ता. चार) तिसरा शिरूर अनंतपाळ तालुका पाणंदमुक्त होऊन जिल्ह्याने मराठवाड्यात हॅट्ट्रिक साधली आहे. जिल्ह्यातील उर्वरित सात तालुकेही येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत पाणंदमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक दिवसागणिक उद्दिष्ट तडीस नेत पाणंदमुक्तीची प्रभावी चळवळ उभारली आहे.

स्वच्छ भारत मिशनमधून जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यासोबत शौचाला उघड्यावर जाण्याला पूर्ण आळा घालण्याचे प्रयत्न मिशनमधून होत आहेत. स्वच्छतागृह बांधणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंतच्या प्रयत्नांत जिल्ह्यात वर्षभरात कधीही २६ हजार स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. मात्र, मागील वर्षापासून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पाणंदमुक्तीच्या चळवळीला गती दिली. यातूनच मागील वर्षभरात ४६ हजार कुटुंबांनी स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर सुरू केला आहे. यामुळे मराठवाड्यात जिल्ह्यातील देवणी तालुका पहिल्यांदा पाणंदमुक्त झाला.

त्यानंतर जळकोट तालुक्‍याने मराठवाड्यात दुसऱ्यांदा पाणंदमुक्त होण्याचा मान मिळवला. शुक्रवारी (ता. पाच) येथे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा होत असून कार्यशाळेच्या पूर्वसंध्येला शिरूर अनंतपाळ तालुका पाणंदमुक्त झाला आहे. यामुळे पाणंदमुक्तीच्या चळवळीत जिल्ह्याने मराठवाड्यात हॅट्ट्रिक साधली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील ४२ गावांतील बारा हजार ५५८ कुटुंबांनी स्वच्छतागृहाची उभारणी करून हा मान मिळवल्याचे डॉ. गुरसळ यांनी सांगितले. 
 

पंधरा ऑगस्ट अन्‌ हागणदारी नष्ट
जिल्हा येत्या १५ ऑगस्टपर्यंत पाणंदमुक्त करण्यासाठी डॉ. गुरसळ यांनी ‘पंधरा ऑगस्ट ः हागणदारी नष्ट’चा नारा दिला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नव्वद हजार कुटुंबांकडे स्वच्छतागृह पूर्ण करावे लागणार आहेत. यातूनच दिवसाला ६५५ स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट ठेवले असून त्यातही दररोज ७३० स्वच्छतागृहे उभारून जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे यांच्या संकल्पनेतून नुकत्याच घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहून लवकरच सरपंच परिषद घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com