लातूर - 'सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे धोरण दिसत आहे. साखरचे भाव सहाशे रुपयांनी उतरूनही सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही. ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने पुढच्या वर्षी आणखी मोठी समस्या निर्माण होणार आहेत. साखर कारखानेच चालू झाले नाही, तर भरपाई देऊन सरकार बुडून जाईल, अशी भीती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची "हल्लाबोल यात्रा' शुक्रवारी लातूर जिल्ह्यात होती. येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. कर्जमाफी व्यवस्थित दिली नाही, वीजजोडणी देण्याअगोदरच वीजबिल दिले जात आहेत. माफक दरात वीज नाही, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही, अशा विविध मुद्यांवरून पवार यांनी सरकारवर टीका केली.
शेतकऱ्यास लाखाची मदत
विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे एकंबी (ता. औसा) येथील शेतकरी शहाजी राठोड यांना "राष्ट्रवादी'च्या वतीने उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन राठोड यांची भेट घेतली व त्यांना मदत केली. "महावितरण'ने चुकीचे बिल देऊन राठोड यांच्या कृषिपंपाची व पिठाच्या गिरणीची वीज तोडली. परिणामी, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच बंद पडले. यातून त्यांनी काही दिवसांपूर्वी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
|