लातूर - पडलेल्या पावसाचे आतापासूनच नियोजन केले गेले नाही तर येत्या 50 वर्षांत समाजातील 70 टक्के लोक हे पाण्यासाठी वणवण भटकताना दिसून येतील. येत्या काळात पाण्याची भीषणता अधिक तीव्र होईल. त्यामुळे आता गावागावांत पाणी सप्ताह झाले पाहिजेत. पाणी अडवून जिरवणे व वृक्षलागवडीसाठी वारकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेतकरी नेते व माजी आमदार पाशा पटेल यांनी मंगळवारी केले.
महाराष्ट्र वारकरी परिषदेच्या वतीने आयोजित संत साहित्य संमेलनात आज "पाणी नियोजन' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चैतन्य महाराज कबीर बुवा होते. यावेळी पुण्याचे जलतज्ज्ञ अनिल पाटील, निवृत्ती महाराज, संमेलनाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक तथा वारकरी परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
'पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यावरणाचा असमतोल या सर्व बाबींना कारणीभूत आहे. परंतु, सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या आजच्या पिढीला ही गोष्ट अजिबात समजत नाही, हे फार विचित्र आहे. आपण ओढ्याची जिरवली, त्यामुळे ओढे आता आपली जिरवत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातूनच सर्व काही खेळ बिघडला आहे,'' असे पाशा पटेल म्हणाले.
चाळीस पन्नास फूट रुंद असलेले ओढे आता तीन चार फुटांवर आले आहेत. आपण हे ओढे जिवंत करण्याची गरज आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी गावागावांत पाणी अडविणे व जिरविणे तसेच झाडे लावण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाण्याचे नियोजन महत्त्वाचे
'आपल्याकडे कितीही दुष्काळ पडला तरी 250 मि.लि. पाऊस पडतोच. मात्र पाण्याचे व्यवस्थित नियोजन नसल्याने पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. देशात छोट्या मोठ्या मिळून तब्बल 20 हजार नद्या आहेत. त्यापैकी 19 हजार 500 नद्यांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे. त्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते उपयोगात आणता येत नाही. वाढत्या प्रदूषणाने नद्या वाहणे कमी झाले आहे. पाण्याचे नियोजन केले तरच सजीवसृष्टी पृथ्वीतलावर तग धरू शकेल,'' असे पटेल म्हणाले.
|