लातूर - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेतकऱ्यांपर्यंत जावेत, याकरिता भाजपच्या वतीने शिवार संवाद सभेचे आयोजन केले आहे. हलगरा (ता. निलंगा) येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 25) सकाळी या अभियानाची सुरवात होईल,'' अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या वतीने 25 ते 28 मे या चार दिवसांच्या कालावधीत शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यात मुख्यमंत्री फडणवीस, उत्तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विदर्भात सुधीर मुनगंटीवार, पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील; तर कोकणात विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हे अभियान सुरू होत आहे, असे निलंगेकर म्हणाले.
या अभियानाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात येणार आहेत.
|