गावकऱ्यांचे कष्ट अन्‌ श्रद्धेला मिळाले आराधनेचे बळ

गावकऱ्यांचे कष्ट अन्‌ श्रद्धेला मिळाले आराधनेचे बळ

निलंगा - शिक्षणाचा पाया रचल्याशिवाय गावाची व कुटुंबाची उन्नती नाही हे चांगल्या पद्धतीने हेरले ते माकणी (थोर) (ता. निलंगा) या गावाने. येथील जाज्वल देवस्थान असलेल्या हनुमानावर सर्वांची श्रद्धा तर आहेच. शिवाय आपल्या जीवनात चुका होणार नाहीत, याची काळजी घेत सर्वजण आराधना करतात ती हनुमानाची. शिवाय माणुसकीचीही आराधनाच म्हणावी लागेल. गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे.  

कष्टातून पुढारलेल्या या गावाने शिक्षणाचे महत्त्व ओळखले. येथे घर तेथे नोकरदार आहेत. शिवाय गावातील निवडणुकांना फाटा देऊन बिनविरोध निवडणुका पार पाडण्याची परंपराही आहे. 

निलंगा-औराद शहाजानी या राज्यमार्गाच्या बाजूला माकणी थोर गाव आहे. निलंग्यापासून १६ किलोमीटरवर सिरसी-हंगरगा पाटीवर गावाची कमान आहे. गावचे वैशिष्ट्य म्हणजे, आराधना. परिसरातील प्रत्येक गावातील लोक या आराधनेला येतात. सव्वाशे वर्षांपासूनची ही हनुमान आराधनेची परंपरा चालते. (कै.) संग्राम माकणीकर व दौलतराव येळीकर यांनी शिक्षणासाठी पूर्वी प्रयत्न केले. (कै.) संग्राम माकणीकर हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे बारा वर्षे अध्यक्ष राहिले. शिवाय शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण व महसूलमंत्री होते. त्यांनी गावात शैक्षणिक संस्था स्थापन केली. त्यामुळे घराघरातील व्यक्ती शिकला म्हणून आज घर तेथे नोकरदार आहेत. येथील हनुमानाचे मंदिर महाराष्ट्र व कर्नाटक या सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या हनुमानाची आराधना ही समाजातील सर्वच भाविकांच्या इच्छापूर्तीचे ठिकाण बनले आहे. या हनुमानाला बोललेला नवस पूर्ण झाल्यानंतर ही आराधना केली जाते. संकल्पपूर्तीनंतर भक्त आराधनेच्या माध्यमातून नवस फेडत असतात. या हनुमानाच्या आराधना दीपवालीच्या नंतर चालू होतात. दीपवालीनंतर येणाऱ्या तुळशी बारसच्या दिवशी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आराधनांची तारीख निश्‍चित केली जाते. 

या वेळी इच्छुक भाविकांना मंदिर समितीमार्फत बोलाविले जाते व त्यानंतर शनिवार व मंगळवार या दोन दिवशी भाविकांच्या इच्छेनुसार तारीख दिली जाते. आराधनेत सर्व समाजांचे लोक सहभागी होतात. विशेष म्हणजे ज्यांची आराधनात तो फक्त खर्च करतो तर ग्रामस्थ हे स्वयंपाक करणे आणि वाटप करण्याचे काम करीत असतात.  भाविकांची सेवा करण्यातून नम्रतेची भावना तयार होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वर्षातून ५० पेक्षा जास्त आराधना होतात. यासाठी दीड लाखापेक्षा जास्त खर्च येतो व दहा हजारांपेक्षा जास्त भाविक जेवण करीत असतात. तर मंगळवारच्या आराधनेसाठी भक्तांची संख्या कमी असल्यामुळे एक लाखापर्यंत खर्च येतो. या गावातील हनुमान मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. या हनुमानाची आराधना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून भाविकांची मागणी असते. त्यामुळे आरधनेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या बाराशेपेक्षा जास्त आहे. शिवराज पाटील चाकूरकर, दिलीपराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, संभाजी पाटील निलंगेकर अशा सर्व मोठ्या राजकीय मंडळींचे हे श्रद्धास्थान आहे.  

तीर्थक्षेत्रामुळे अर्थकारण बदलले
मंदिर समितिमार्फत गावात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. देणग्यांमुळे भक्तांसाठी मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायतीने मागील काळात अनेक उपक्रम राबलविले असून सामाजिक शिक्षणाबरोबर महिलांच्या बाबतीत आरोग्याचे शिक्षण दिले जाते. शिवाय अनेकांना छोटा-मोठा रोजगारही मिळाला आहे.

पूर्वी गावचा शिवार केवळ १७०० एकर होता. मात्र, येथील लोक कष्टकरी असल्याने येथील जमीन कोरडवाहू असूनही येथील लोकांनी आजूबाजूच्या शिवारातील जमिनी विकत घेत आता तीन हजार २०० एकर झाले आहे. आराधनाही पुढील अनेक वर्षांसाठी बुकिंग आहे. गावात सामाजिक सलोखा आहे. येथील आराधनेला मोठा इतिहास असून पूर्वी मोजकीच असणारी आराधना आता हजारो लोक प्रसादासाठी येत असतात.
- तानाजी माकणीकर, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com