औरंगाबाद - राज्याची लोकसंख्या सव्वाअकरा कोटींवर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र, पोलिसांचे संख्याबळ अत्यंत कमी आहे, अशी चिंता व्यक्त करीत मनुष्यबळ वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा गुरुवारी (ता. 12) आयआरबीच्या मैदानावर समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, 'महाराष्ट्र देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. सर्वधर्म समभावाची उत्तम परंपरा असून, अन्य राज्यांच्या तुलनेत कायदा व सुव्यवस्थाही चांगली आहे. राज्याच्या प्रगतीत पोलिसांचे अतुलनीय योगदान आहे. पोलिस हा सरकारचा चेहरा आहे. कठीण प्रसंगात काम करून पोलिसांना चोवीस तास दक्ष राहावे लागते. पोलिस क्रीडा स्पर्धा त्यांच्यासाठी पर्वणी व थोडा विरामाचा काळ असतो.''
मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी पोलिसांचे शौर्य दिसून आले असून, देश त्यांच्या कामगिरीला विसरू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. सायबर गुन्हे वाढत आहेत. महिला अत्याचार, खासकरून महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीचे गुन्हे वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. पोलिसांच्या समस्यांवर त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधत पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
|