शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दिल्लीत कृषी परिषद

औरंगाबाद - कृषी परिषदेत उदय देवळाणकर विविध विषयावरील सादरीकरण करत असताना बारकाईने न्याहाळताना कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत. उपस्थित पाशा पटेल आदी.
औरंगाबाद - कृषी परिषदेत उदय देवळाणकर विविध विषयावरील सादरीकरण करत असताना बारकाईने न्याहाळताना कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत. उपस्थित पाशा पटेल आदी.

औरंगाबाद - शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा आणि हवामान बदलावर आधारित शेती पद्धती, वायदे बाजारातील सुधारणा, पेरणी ते काढणीपर्यंतचे तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना देता यावे, यासाठी दिल्ली येथे दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते सोमवारी (ता. १९) उद्‌घाटन झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित परिषदेत विविध प्रकारच्या सात गटांत विभागणी करण्यात आली असून, विपणन आणि कृषी उत्पादन खर्चावर आधारित भाव या विषयावर आधारित गटाची जबाबदारी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे देण्यात आली आहे. यासाठी गत एक महिन्यापासून उद्योगपती, बाजारपेठांचे तज्ज्ञ, शेतीशी निगडित काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी श्री. पटेल हे चर्चा करीत होते. कृषी सचिव एस. के. पट्टनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत असून, या परिषदेसाठी कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज, गजेंद्रसिंग शेखावत, पुरुषोत्तम रूपाला यांच्यासह शेती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, अशोक दलवाई समितीचे अध्यक्ष अशोक दलवाई यांची उपस्थिती होती. 

पंतप्रधान मोदी लावणार हजेरी 
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २०) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार असून, शेती संदर्भातील विविध बाबींच्या तज्ज्ञांकडून सखोल माहिती ते घेणार आहेत. संबंधितांकडूनही आवश्‍यक त्या सूचना मांडण्यात येणार असल्याचेही श्री. देवळाणकर यांनी सांगितले.

देश पातळीवरील आराखड्याचे सादरीकरण 
शेतकऱ्यांचा माल ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी देशपातळीवर योजना आखली जाणार आहे. दलालांना हटविण्यासाठी विशेष सुधारणा करण्यात करण्यात येणार असून, जगातील सर्व प्रकारची पेरणी आणि उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञांतर्फे एक आराखडात्मक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये नाशवंत शेतमाल यात टोमॅटो, कांदा, बटाटा याचा विशेष समावेश आहे.

परिषदेदरम्यान पाशा पटेल व उदय देवळाणकर यांनी या विषयावर सादरीकरण केले. यातील कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी महाराष्ट्र राज्यातील हमीभावासारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर बारकाईने लक्ष देऊन माहिती घेतल्याचे श्री. देवळाणकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com