महापालिकेने आरोग्याचा खेळ मांडला!

औरंगाबाद - नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये गुरुवारपासून कचरा टाकण्यास विरोध करीत नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
औरंगाबाद - नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये गुरुवारपासून कचरा टाकण्यास विरोध करीत नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

औरंगाबाद - महापालिकेने शहरातील पंधरा लाख नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडला असून, सहाव्या दिवशी देखील कचऱ्याच्या जागेची कोंडी फुटली नसल्याने धाकधूक वाढली आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र कायम असले, तरी गेल्या पस्तीस वर्षांत काढलेल्या झोपेमुळे आता त्यांना तोंड दाखवायला जागा नसल्याचे चित्र सध्या आहे. 

दरम्यान, नारेगाव येथील नागरिकांनी पुन्हा एकदा बुधवारी (ता. २१) दोन महिन्यांची वेळ देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव धुडकावला. 

नारेगाव (मांडकी) परिसरातील सुमारे पंधरा गावांतील नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन करून सहा दिवसांपासून महापालिकेची कोंडी केली आहे. गेल्या पस्तीस वर्षांत नारेगाव परिसरातील नागरिकांचे जीवन बेहाल करून टाकणाऱ्या या कचरा डेपोच्या विरोधात अनेकवेळा आंदोलने झाली. प्रत्येक वेळी महापालिकेने आश्‍वासनांची पाने पुसून नागरिकांची दिशाभूल केली. गतवर्षी दिवाळीत नागरिकांनी निर्वाणीचा इशारा देत चार दिवस आंदोलन केले होते. त्या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे महापालिकेच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री खेळ केल्याने नागरिकांचा रोष वाढला असून, आंदोलनाचा तब्बल सहावा दिवस उजाडूनही कचराकोंडीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शहरात तब्बल दोन ते अडीच हजार टनांच्या कचऱ्याचे ढिगारे साचून आहेत. येत्या एक-दोन दिवसांत कचऱ्याची कोंडी फुटली नाही तर शहरातील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्‍यता आहे. 

नारेगावच्या फसवणुकीमुळे अडवणूक 
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेचे दहा वर्षांपासून प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचा कचरा केल्यानंतर देखील नारेगाव परिसरातील नागरिकांची सुटका झाली नाही. सुरवातीला ‘सत्यम फर्टिलायझर’ या कंपनीला कचऱ्यापासून खत तयार करण्याचे काम देण्यात आले. त्यानंतर खड्डे करून त्यात कचरा टाकायचा व गॅसनिर्मिती, वीजनिर्मिती करण्याची वल्गना महापालिकेने केली; मात्र एकही प्रयोग यशस्वी झाली नसल्याने नारेगावात आजघडीला सुमारे पंधरा ते वीस लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे. नारेगावकरांची फसवणूक केली आता आमची नको, अशा संतप्त प्रतिक्रिया अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी ऐकाव्या लागत आहेत. 

न्यायालयाचा आदेशही धुडकावला 
नारेगाव येथील कचरा डेपो विमानतळाच्या कक्षेत येत असल्याने तो हटविण्यात यावा, असे आदेश बारा वर्षांपूर्वी न्यायालयाने दिले आहेत; मात्र महापालिका प्रशासनाला जागेचा शोध घेण्यात अद्याप यश आलेले नाही.

नारेगावात दिला अल्टिमेटम
कचराकोंडीवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी सहा जणांच्या शिष्टमंडळाने नारेगावात जाऊन नागरिकांची भेट घेऊन पुन्हा विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी. पी. कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, अपर तहसीलदार रमेश मुनलोड, तहसीलदार सतीश सोनी, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. महापालिकेला दोन महिन्यांचा वेळ देण्यात यावा, अशी विनंती केली असता, नागरिकांनी नकार दिला. त्यावर गुरुवारपासून पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com