औरंगाबाद - राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवडीवर भर देऊन गेल्या दोन वर्षांत सहा कोटी वृक्षांची लागवड केली. यंदाही तेरा कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. एक ते 10 जुलैदरम्यान राज्यभरात पाच कोटी 31 लाख वृक्षलागवड झाली असून, यात मराठवाडा विभागाने एक कोटी 58 लाख 94 हजार 207 वृक्षांची लागवड करीत आघाडी घेतली आहे.
सरकारने गेल्या वर्षी चार कोटी वृक्षलागवड केल्यानंतर यंदा तेरा कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार केला असून, सर्व विभागांना उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. मराठवाड्याला या वर्षी तीन कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील निम्मा टप्पा पार पाडत मराठवाड्याने राज्यात आघाडी घेतली. त्यानंतर नागपूर विभागाने एक कोटी सहा लाख 32 हजार 193 वृक्षलागवड करीत दुसरे स्थान मिळविले. तसेच, तिसऱ्या स्थानावर असलेल्या नाशिक विभागाने 87 लाख 31 हजार 835, कोकण विभागाने 67 लाख 20 हजार 966, अमरावती विभागाने 62 लाख 67 हजार 219 वृक्षलागवड केली.
राज्यातील वृक्षलागवड
1,58,94,207 - मराठवाडा
1,06,32,193 - नागपूर
87,31,835 - नाशिक
67,20,966 - कोकण
62,67,219 - अमरावती
संवर्धनाचे काय?
यंदाही वृक्षलागवड मोठा वेग घेत असली तरी वृक्षसंवर्धनाचे काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. एकीकडे पूरस्थिती असताना दुसरीकडे अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे अशा भागातील वृक्षसंवर्धन करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
|