नांदेड - धर्माच्या नावाखाली रूढी-परंपरेच्या गर्तेत अडकलेल्या स्त्रीने बंधनाचे फास तोडले पाहिजेत. माणसे जोडण्याचे विचारपीठ म्हणून जिजाऊ ब्रिगेडने लौकिक मिळवला आहे. सक्षम समाजासाठी आधुनिक जिजाऊच परिवर्तनाची आधारवड असल्याचे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे आज व्यक्त केले.
मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या पाचव्या राष्ट्री महाअधिवेशनाचा समारोप आज झाला. त्या वेळी ते बोलत होते.
खेडेकर म्हणाले, 'माणसाला केवळ उंची मिळून उपयोग नाही, त्याचा समाजहितासाठी वापर करता आला पाहिजे, वैचारिक देवाण-घेवाणीसह माणसे जोडण्यासाठी अधिवेशनांची गरज आहे. महिला अत्याचाराच्या विरोधात कायदे करणे चांगले असले, तरी अत्याचार होणारच नाहीत, याची काळजी महिलांनी घेणे आवश्यक आहे. स्त्री अत्याचाराच्या समूळ उच्चाटनासाठी रस्त्यात गुंडांना झोडपून काढणारी स्त्री निमूटपणे पतीचा जुलूम सोसते. संरक्षणाची बाजू स्त्रीने स्वत: पेलणे आवश्यक आहे.''
|