नांदेड: पैसे नसल्यामुळे पत्नी व मुलीला जुंपले औताला

नांदेड: पैसे नसल्यामुळे पत्नी व मुलीला जुंपले औताला
नांदेड: पैसे नसल्यामुळे पत्नी व मुलीला जुंपले औताला

मुक्रमाबाद (नांदेड) : भारतीय अर्थ व्यवस्थेचा मुख्य कणा शेतकरी असल्यामुळे आपल्या देशात शेतकऱ्यांना शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा, बळीराजा असे एक ना अनेक नावाने माठ्या गर्वाने व अभिमानाने म्हटले जाते; पण याच जगाच्या पोशिंद्यावर ओढावलेली परिस्थीती पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी यावे. गेल्या दहा वर्षांपासून शेतात पेरणी व कोळपणी करण्यासाठी पैसेच नसल्यामुळे आपल्या पत्नीला व मुलीलाच औताला जुंपण्याची वेळ नांदेड जिल्ह्यातील उत्तम भीमा चव्हाण या शेतकऱ्यावर आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील उत्तम भीमा चव्हाण यांचे गावापासून तीन किलोमीटरवर हातराळ शिवारालगत खडकाळ भागावर दोन एकरची गायरान जमीन आहे. या खडकाळ जमिनीवर वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढेही उत्पन्न येत नाही. घरात दोन मुली लग्नाच्या उंबरठ्यावर असून त्यात मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहेच. चव्हाण यांना एकूण पाच मुली होत्या. त्यापैकी तिघींचे विवाह झाले. त्यासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यावे लागले. त्यातील जवळपास अडीच लाख आणखी फेडायचे आहेत. त्यात एका मुलीचा विवाह आता करावा लागणार आहे. सावकाराचे पहिलेच कर्ज न फेडल्यामुळे पुन्हा कर्ज कोण देणार? शेतात पेरणी व कोळपणी करण्यासाठी बैलजोडी व एका माणासाला एका दिवसाची मजूरी हे सव्वा दोन ते अडीच हजार रुपये द्यावी लागते. घरची बैलजोड व शेती साहित्यही उपलब्ध नाही. ते विकतही घेऊ शकत नाही. आणि एवढी महागडी मजूरी पेलवणारी नाही. त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पेरणी व कोळपणीची सर्व कामे पत्नीला, मुलीला, तर कधी उत्तम चव्हाण स्वतः औताला जुंपूनच करुन घेतात. गेल्या चाळीस वर्षांपासून हे कुटुंब गायरान जमीन कसत आहे. सरकारने ही गायरान जमीन अजून या कुटुंबाच्या नावावर केली नसल्यामुळे बॅंक कर्ज देत नाही.

पत्नी व पोटाच्या मुलीला औताला जुंपून पेरणी व कोळपणी करताना डोळ्यांतून पाणी येते. खेळायच्या, बागडण्याच्या वयात मुलींच्या खांद्यावर असलेले पेरणी व कोळपणीचे औत पाहून काळीजाचे पाणी... पाणी होते. काय करावे सरकारही कुठली मदत करत नाही.
- उत्तम चव्हाण, शेतकरी

तीन मुलींच्या लग्नासाठी काढलेले सावकाराचे कर्ज फिटता फिटत नाही. दिवसेंदिवस व्याज वाढत असून अजून दोन मुली लग्नाच्या आहेत. या मुलींचे लग्न कसे करावे सूचत नाही. शेतात वर्षभर पुरेल एवढे ज्वारी व डाळही होत नाही. कर्ज कसे फेडावे, मुलांचे शिक्षण कसे करावे. या विचाराने अनेकदा आत्महत्या करण्याचे मनात आले होते; पण आत्महत्या केल्यानंतर मुले रस्त्यावर येतील म्हणून कष्ट करुन जगत आहोत.
- कसूबाई चव्हाण, पत्नी

इतर मुलींप्रमाणे मलाही शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे वाटते. घरच्या परिस्थितीमुळे आम्ही एकही बहिण शाळेत गेलो नाही. घरीच राहून आई-वडिलजांना शेतातील कामे करुन मदत करतो. इतर मुलींच्या पाठीवर शिक्षणाची दप्तरे टाकलेली असतात तर माझ्या खांद्यावर पेरणी व कोळपणीचे औत पाहून फारच वाईट वाटते; पण आई-वडिलांची मदत करत असल्याचे समाधानही वाटते.
- शाहूबाई चव्हाण, मुलगी

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com