नेहरू भवन पाडणार; गांधी भवनची पडझड

औरंगाबाद - शहागंज येथील गांधी भवनाच्या मुख्य हॉलमध्ये स्लॅबचे प्लॅस्टर असे जागोजागी कोसळले आहे. त्यामुळे या हॉलचा वापर बंद करण्यात आला आहे.
औरंगाबाद - शहागंज येथील गांधी भवनाच्या मुख्य हॉलमध्ये स्लॅबचे प्लॅस्टर असे जागोजागी कोसळले आहे. त्यामुळे या हॉलचा वापर बंद करण्यात आला आहे.

औरंगाबाद - कधीकाळी शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू भवनाची इमारत पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेली ही इमारत पाडून त्या ठिकाणी टीव्ही सेंटरच्या धर्तीवर व्यापारी संकुल विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो महापालिकेच्या मंगळवारी (ता. ११) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येईल.

शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारण्यात आले होते. या ठिकाणी नाटक, मुशायरा, गझलांच्या अनेक मैफली दिग्गज रंगकर्मींनी गाजविल्या; मात्र गेल्या काही वर्षांपासून नेहरू भवन अडगळीत पडले होते. इमारतीचा वापर बंदच आहे. 

खुली जागा लग्न, खासगी समारंभासाठी वापरण्यात येत आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्नही कमी प्रमाणात मिळते, तर इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीवर जास्तीचा खर्च होतो. म्हणून ही इमारत पाडून त्या ठिकाणी प्रेक्षकगृह, समारंभ हॉल व व्यापारी संकुल तयार करण्याचा प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीनुसार या बांधकामाचा अपेक्षित खर्च सुमारे १३.२३ कोटी एवढा राहणार आहे, तर महापालिकेला अपेक्षित उत्पन्न १७ कोटी एवढे आहे.

तब्बल तीस वर्षे देणार भाडेकरारावर 
नेहरू भवनाची जागा चार हजार ५० चौरस मीटर एवढी आहे. त्यात २६ दुकाने, २४ व्यापारी कार्यालये, प्रेक्षकगृह आणि मेजवानी हॉल, वाहनतळ अशी कामे केली जाणार आहेत. व्यापारी संकुल तीस वर्षे भाडेकरारावर दिली जाणार आहेत. 

गांधी भवनची पडझड
औरंगाबाद - काँग्रेसच्या साठ वर्षांच्या सत्तेत दिग्गज नेत्यांनी हजेरी लावलेल्या शहागंज येथील गांधी भवनाची सध्या पडझड झाली आहे. इमारतीमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टर कोसळले असून, काही वर्षांत साधी रंगरंगोटीदेखील करण्यात आलेली नाही. दुरवस्था झालेल्या या इमारतीमध्येच अद्याप बैठकांचे सत्र सुरू आहे; मात्र गांधी भवनच्या दुरुस्तीकडे ना पक्षाचे लक्ष आहे ना नेत्यांचे.

शहागंज येथील गांधी भवनचे पाच ऑगस्ट १९७२ ला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या हस्ते व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले होते. तेव्हापासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या गांधी भवनातून काँग्रेसचे राजकारण सुरू आहे. प्रत्येक निवडणुकांसाठी दिग्गज नेते, पदाधिकारी येथे बैठका घेतात. 

पक्षाच्या आंदोलनांची दिशा याच ठिकाणाहून ठरते. मात्र, गेल्या काही वर्षांत गांधी भवनाकडे बघायला नेत्यांना वेळ राहिलेला नाही. त्यामुळे इमारतीची पडझड सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे. त्यातून सळया उघड्या पडल्या आहेत. 

भाडेकरूंच्या वादात नूतनीकरण रखडले 
इमारत जुनी झाल्यामुळे ती पाडून नव्याने बांधण्याचे नियोजन पक्षाकडून करण्यात आल्याचे काही वर्षांपूर्वी सांगितले जात होते. मात्र, गांधीभवनमध्ये अनेक भाडेकरू आहेत. त्यांना नाममात्र भाडे आहे. ते गाळे सोडण्यास तयार नाहीत, त्यामुळे नव्या इमारतीचे बांधकाम करण्यास अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com