पावले वळू लागली तेलघाण्यांकडे!

पावले वळू लागली तेलघाण्यांकडे!

औरंगाबाद - परंपरेने चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. मात्र, कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक पद्धतीचे तेलघाणे अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत. 

घाण्यातून काढलेले तेल शुद्ध असते. त्यात रंग, रसायनांचा वापर होत नाही. हे तेल शरीरासाठी गुणकारी असल्याने मागील दोन वर्षांत शहरात घाण्यापासून तयार कलेल्या तेलाच्या विक्रीचा आलेख वाढता आहे.

आरोग्याबाबत जागृती वाढत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील लोकांची पावले तेल खरेदीसाठी तेलाच्या घाण्यांकडे वळली आहे. 

पूर्वी औरंगाबादेत होते ४० पेक्षा जास्त घाणे
तेलविक्रेते अशोक मिटकर म्हणाले, की पूर्वी शहरात पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली जवळपास ४० पेक्षा जास्त घाणे होते. जालन्यात तर जवळपास ४०० घाणे होते. मात्र काळाच्या ओघात ते पडले. आज औरंगाबादेत पाचच्या जवळपास घाणे असतील.

या घाण्यांमध्ये काळ्याच्या ओघात काही बदल झाले. यामध्ये ८० च्या दशकात वीजघाणे आले. आता पोर्टेबल पॉवर घाण्याचासुद्धा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, इतर कंपन्यांच्या स्पर्धेत तेलाचे घाणे चालवणे फार जिकिरीचे आहे. 

करडई मिळणे अवघड, त्यातच टॅक्‍स
आता उत्पादन कमी झाल्याने करडई आणण्यासाठी अडचणी येतात. छोटे घाणेचालक मोठ्या कंपन्यांची बरोबरी कधीच करू शकणार नाहीत. तरीही घाणेचालक कर्नाटक, लातूर, उदगीर, आंध्र व कर्नाटकच्या सीमाभागातून करडई विकत आणतात. वाहतूक आणि उत्पादन खर्च जास्त होतो. सर्व प्रकारचा खर्च पकडला तर घाण्याचे तेल १४५ रुपये प्रतिकिलोपेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही. सध्या करडईचे घाण्यातील तेल १४८ रुपये प्रतिकिलो किंवा १३६ रुपये लिटरप्रमाणे विक्री करावे लागते. पूर्वी तेल उत्पादकांवर व्हॅट, तर आता पाच टक्के जीएसटी आहे. 

कमी व्याजाने कर्ज द्यावे 
अशोक मिटकर, घाणेचालक ः आम्हाला पूर्वी खादी कमिशनकडून सहा टक्के व्याजाने पैसे मिळत होते; मात्र आता ते मिळत नाहीत. पैसे, साधने उपलब्ध नसल्याने आम्ही मोठ्या कंपन्यांची बरोबरी करू शकत नाही. आम्हाला शासनाने आर्थिक पाठबळ द्यावे.

स्वतंत्र आर्थिक महामंडळ हवे
कचरू वेळंजकर, जिल्हाध्यक्ष, तेली व्यापारी संघटना ः तेल उत्पादकांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे. त्यातून आम्हाला पारंपरिक पद्धतीने तेलाचे उत्पादन घेता येईल. आता घाण्याच्या तेलाची मागणी वाढत असल्याने आम्हाला अल्पव्याजदराने आर्थिक पुरवठा व्हायला हवा.

विजेच्या घाण्यातून १२ तासांत २४० किलो तेल
बैलाच्या घाण्यातून फक्त ४० ते ५० किलो तेल
दुकानात किरकोळमध्ये दररोज ५० किलोंची विक्री
तुलनेत घाण्याच्या तेलाच्या किमती दुप्पट, तरीही मागणी
पूर्वी पेंडीची ३५ रुपयांनी विक्री, आता १८ रुपयेच दर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com