औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण न करता कार्यक्रम सुरू केल्याने काही जणांनी आक्षेप घेतला. शहरातून हार आणून अर्पण करायला तब्बल वीस मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील प्राचार्यांची महत्त्वाची बैठक ठप्प झाली होती. सिफार्ट सभागृहात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला.
विद्यापीठांर्तगत या वर्षी पदवी शिक्षणासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याच्या निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी विद्यपीठांतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य आणि महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची आज बैठक होती. कुलगुरूंनी मार्गदर्शनास सुरवात केली. या वेळी "व्यासपीठावर ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा; नंतरच कार्यक्रम सुरू करण्यात यावा,' अशी भूमिका "मुप्टा'चे सुनील मगरे, डॉ. वैशाली प्रधान यांनी घेतली.
विद्यापीठ प्रशासनाने प्रतिमा पूजनाची कोणतीच व्यवस्था केली नसल्याने तारांबळ उडाली. शहरातून दोन हार आणून अर्पण केल्यानंतरच कार्यक्रम सुरू झाला. यासाठी तब्बल 20 मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत ज्या कामासाठी बैठक बोलाविण्यात आली त्याविषयी विरोधाचा सूर तयार झाला होता.
|