औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रवक्ते मनमोहन वैद्य यांच्या आरक्षण बंद करावे या वक्तव्याचा निषेध म्हणून येथील संघाच्या कार्यालयासमोर आरपीआय (खरात) गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज निळ व निषेधांची पत्रके फेकली. त्यानंतर पोलिसांनी संघ कार्यालयाला सुरक्षा पुरविली आहे.
दोन दिवसांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी आरक्षण बंद करण्यासंबंधी वक्तव्य केले होते. याविरोधात औरंगाबादेतील संघ कार्यालयासमोर आरपीआय (खरात) गटाच्या तीन महिला कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. त्यांनी घोषणाबाजी करून निळ आणि पत्रके फेकली. त्यानंतर त्या निघून गेल्या, अशी माहिती जिल्हाध्यक्ष फकिरचंद अवचरमल यांनी दिली. हा प्रकार समजताच पोलिस घटनास्थळी पोचले; परंतु तोपर्यंत कार्यालयासमोरील पत्रके उचलून पडलेल्या निळीवर पाणी टाकत घटना लपविण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान, या घटनेनंतर औरंगाबादेतील संघ कार्यालयाशी संपर्क साधला असता, निळ व पत्रके फेकल्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
|