औरंगाबाद - भारतीय उपखंडातील 36 हवामान विभागांपैकी गुजरात, सौराष्ट्र वगळता 34 विभागांत येत्या पाच दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अवकाळी असला, तरी मॉन्सूनपूर्व पाऊस ठराविक वेळेपेक्षा लवकर आल्यास धोका संभवतो, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
मोसमी पावसासाठी आवश्यक वातावरण तयार होण्यास 1 ते 13 मेदरम्यान कडक उन्हाळा कायम राहणे गरजेचे असते. सध्या भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात बाष्प आले आहे. असे असले तरी फार मोठा किंवा व्यापक पाऊस होऊन भारतीय उपखंडात उष्णतेमुळे जी ऊर्जा तयार होते, ती मॅन्सूनचे भवितव्य ठरविण्यास कारणीभूत ठरते. या पावसाची तीव्रता जास्त व्यापक नसेल. तापमान कमी झाल्यास खंडित पावसाची शक्यता असते.
हवामानातील सकारात्मकता महत्त्वाची
मागील आठवड्यापासून हवामान बदल झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे काय होईल? या भीतीपोटी शेतकऱ्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. इतके ढगाळ वातावरण राहूनही त्याचा परिणाम उष्णतेवर न होता उष्णता टिकून राहण्यास मदत झाली. हवामानातील ही सकारात्मकता महत्त्वाची असल्याचेही श्री. देवळाणकर म्हणाले.
|