औरंगाबाद - पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असला, तरी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांतील 469 गावांमधील पाणीटंचाई दूर होऊ शकली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढलेले असतानाही सर्वाधिक 363 गावे आजही टॅंकरवर अवलंबून आहेत. त्यासाठी 344 विहिरींचे अधिग्रहण केलेले असून, 513 टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे.
सर्वत्र पाऊस बरसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असतानाही पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील 449 गावे, वाड्यांना टंचाईच्या झळा बसत होत्या. आता या टंचाईग्रस्त गावे-वाड्यांमध्ये 38 गावे-वाड्यांची भर पडली आहे. शिवाय गेल्या आठवड्यात टंचाईग्रस्त गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 466 टॅंकरची सोय करण्यात आली होती. त्यामध्ये आता पुन्हा 47 टॅंकरची वाढ करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 363 गावे, 14 वाड्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 53, नांदेडमध्ये 49 गावे-वाड्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यात मात्र टंचाईचा सामना करण्यासाठी सध्या तरी टॅंकर सुरू नसल्याचे चित्र आहे.
|