औरंगाबाद : महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे विकृत समर्थन आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. आगामी काळात अशा नाटकाचे प्रयोग आम्ही उधळून लावू, असा इशाराही संघटनेने दिला.
शिवसेनेतर्फे "हे राम, नथुराम' या नाटकाचा प्रयोग येथील संत तुकाराम नाट्यगृहात शनिवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगास सुरवात झाल्यानंतर काही वेळातच संभाजी ब्रिगेडसह स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी तेथे दाखल झाले. कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात जाऊन घोषणाबाजी केली.
दरम्यान, शिवसैनिक आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी तातडीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नाटकाचा प्रयोग सुरू झाला. या प्रकारानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोड यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, की महात्मा गांधी यांच्या हत्येला वध म्हणत त्याचे विकृत समर्थन या नाटकातून केले जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ब्रिगेडची स्पेशल टास्क ऍक्शन फोर्स तयार असून, यापुढेही राज्यात कुठेही प्रयोग असो, तो उधळून लावला जाईल.
महापुरुषाच्या हत्येनंतर त्यांचा अवमान करणाऱ्या नाटकाचा प्रयोग शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आला, ही दुर्दैवी बाब आहे. यापूर्वीही कोल्हापूर, सांगलीसह अन्य ठिकाणी या नाटकाचा प्रयोग उधळून लावण्याचे काम केले आहे, असे संभाजी ब्रिगेडतर्फे सांगण्यात आले.
|