औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन होणार असून, 17 ठिकाणांहून एकाच वेळी प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. विशेष म्हणजे हा महामार्ग आशियातील 701 किलोमीटर अंतर असलेला सर्वांत मोठा "एक्स्प्रेस वे' ठरणार आहे.
राज्यातील दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी 90 टक्के भूसंपादन होताच लगेचच रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल. या कामाचे कंत्राट एका कंपनीने घेतले असले, तरी त्यात 17 उपकंपन्या वाटेकरी आहेत. त्यामुळे एकाच वेळी 17 ठिकाणांहून कामाला सुरवात होईल. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यानंतर 30 महिन्यांत महामार्ग तयार होईल.
भूसंपादनाची सद्यःस्थिती
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 95 टक्के भूसंपादन झाले आहे; तर वर्धा (89), अमरावती (89), वाशीम (89), बुलडाणा (84), जालना (77), औरंगाबाद (77), अहमदनगर (83), नाशिक (78) आणि ठाणे (82 टक्के) असे भूसंपादन झाले आहे. येत्या काही दिवसांत 90 टक्यापर्यंत भूसंपादनाचा आकडा पोचल्यास प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जमीन लवकर घ्या
थेट खरेदीला काहींनी विरोध केल्याने सरकारने सक्तीने भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना काढली असून, त्याची मुदत संपत आली आहे. कायद्यानुसार खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना सध्या मिळणाऱ्या रकमेपेक्षा 25 टक्के रक्कम कमी मिळणार आहे. खरेदी अंतिम टप्प्यात पोचली असल्यामुळे विरोध करणारे शेतकरीही जमीन देण्यास तयार झाले आहेत. नोंदणीसाठी ते अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत आहेत.
पाच एकरांच्या मोबदल्यात नऊ एकर
जमिनीचे पैसे मिळाल्यानंतर काही जण वाहनांची खरेदी, टोलजंग घरे बांधत आहेत; मात्र याला अनेक शेतकरी अपवादही आहेत. टाकळेवाडी (ता. गंगापूर) येथील महासिंग जारवाल यांची पाच एकर जमीन या प्रकल्पात गेली; मात्र, त्यांनी मोबदल्यातून मिळालेल्या पैशातून नऊ एकर जमीन खरेदी केली.
|