मराठवाड्यातील चित्र : 75 मध्यम प्रकल्पांतील साठाही 60 टक्क्यांवर
औरंगाबाद - मराठवाड्यातील 734 लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शुक्रवारअखेर (ता.20) एक्कावन टक्क्यांवर आला आहे. ऑक्टोबर 2016 च्या मध्यान्हात या पाणीसाठ्याचा टक्का 83.65 वर होता. दुसरीकडे 75 मध्यम प्रकल्पातील झपाट्याने कमी होत असलेल्या पाणीसाठ्यातही जवळपास 21 टक्क्यांची घट नोंदली गेली आहे.
ऑक्टोबर 2016 च्या मध्यान्हात मराठवाड्यातील 841 लघु, मध्यम व बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठ्याचा टक्का 82 च्या पुढे सरकला होता. तेव्हापासून आतापर्यंत पाणीसाठ्यांमध्ये सातत्याने घट नोंदली गेली आहे. गत चार पाच वर्षांत सातत्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पावसाळ्यात व त्यानंतरच्या परतीच्या पावसाने कृपा केली. परंतु, ही कृपा त्यानंतर मोठ्या प्रमाणात घटलेला उपयुक्त पाणीसाठा पाहता पाण्याविषयीची चिंता पुन्हा एकदा वाढीस लागण्याचीच चिन्हे आहेत. मराठवाड्यातील 11 मोठे प्रकल्प मिळून 852 प्रकल्पांत आजघडीला केवळ 55.46 टक्के अर्थात केवळ 4433.60 दलघमी (156.55 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये 75 मध्यम प्रकल्पांतील 570.58 दलघमी (20.14 टीएमसी), 734 लघु प्रकल्पातील 837.51 दलघमी (29.57 टीएमसी), गोदावरील नदीवरील 11 बंधाऱ्यातील 115.46 दलघमी (4.07 टीएमसी), तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 21 बंधाऱ्यातील 31.38 (1.10 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.
आठवडाभरात येलदरीत 32 दलघमी पाणी घटले.
मागील आठवड्याच्या तुलनेत 19 जानेवारी 2017 अखेर परभणी जिल्ह्यातील येलदरी या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात 32 दलघमी (1.12 टीएमसी) ची घट नोंदली घेली आहे. गत आठवड्यात येलदरीत 211 दलघमी (7.45 टीएमसी) उपयुक्त पाणीासाठा होता. 19 जानेवारी रोजी उपयुक्त पाणीसाठा 179 दलघमी (6.32 टीएमसीवर) येऊन पोचला आहे. केवळ 22 टक्केच उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. इतर मोठ्या प्रकल्पांपैकी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात 39 टक्के, विष्णूपुरीत 51 टक्केच उपयुक्त पाणीसाठा उरला आहे.
|