औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त "जय शिवराय, जय भीमराय' फाउंडेशनने मिरवणूक, डीजेचा खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला.
टाकळी माळी (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी विष्णू बुरकूल यांनी 80 हजार रुपयांच्या कर्जापायी आत्महत्या केली होती. ही बातमी वाचून "जय शिवराय जय भीमराय' फाउंडेशनच्या सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठरविलेला मिरवणूक आणि डी.जे.चा कार्यक्रम रद्द करून तोच पैसा या कुटुंबास मदत म्हणून देण्याचे ठरवले. डॉ. बाबासाहेबांनी आपले आयुष्य मागास व वंचित जनतेच्या भल्याकरिता वेचले. त्यांच्या जयंतीला अशा वंचित कुटुंबीयांस मदत करणे, हीच खरी आदरांजली असेल, असे म्हणून सदस्यांनी कार्यक्रमासाठी जमा केलेला 23 हजार 700 रुपयांचा निधी अजय दामा पाटील, राजेश मुंढे, राहुल पाटील यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सुपूर्द केला.
या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक धनंजय देशमुख व अध्यक्ष आकाश नरवडे यांनी केले होते. मयूर विधाते, अमोल भालेराव, अमित मोरे, विकास खरात, प्रतीक चव्हाण, विकी नरवडे, अतुल खरात आदींनी परिश्रम घेतले.
|