औरंगाबाद - यंदा सरासरी 97 टक्के पाऊस पडेल, असा स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानंतर काही तासांतच मराठवाड्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात विजेने तीन जणांचा बळी घेतला.
लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारी येथील राम माधवराव बिराजदार (वय 59) यांचा रविवारी दुपारी चार वाजता, तर परभणी परिसरातील पिंपरी देशमुख येथील आशा हनुमान आवकाळ यांचा सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला. नांदेड येथील मृताचे नाव समजू शकले नाही. तसेच नांदेड जिल्ह्यात 5, उस्मानाबाद जिल्ह्यात 13, तर लातूर जिल्ह्यातील 4 जनावरे मृत्युमुखी पडली.
औंढ्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
औंढा नागनाथ - औंढा शहरासह परिसरात येथे सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडल्याने तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी रामभाऊ ज्ञानेश्वर लिंबाळकर (वय 25) यांचा मृत्यू झाला. पाऊस थांबल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
|