औरंगाबाद - केवळ स्वप्नरंजन गुटिका देऊन उपयोगाचे नाही. जनतेला त्यांच्यासाठी काम करणारे सरकार हवे आहे. जनतेच्या सारे लक्षात येत आहे, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. गुरुवारी औरंगाबादेत मराठवाड्यासह सोलापूर व नगर जिल्ह्यांतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे म्हणाले, 'केवळ अधिवेशन, बैठका घेऊन उपयोग नाही, तर राज्यातील प्रत्येक भागासाठी सरकारने योजना आणायला हव्यात. निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करण्याबाबत चाचपणी बैठकांची सुरवात झाली आहे. हे केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित राहणार नसून, उर्वरित महाराष्ट्रातही अशी चाचपणी केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या तयारीविषयी चाचपणी करण्याच्या अनुषंगाने आज मराठवाड्याची बैठक घेण्यात आली.''
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांची नियुक्ती करून त्यांच्याकडून अहवाल मागितला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठ व इतर चार अशा 12 लोकसभा मतदारसंघांत पक्ष तयारीचा आढावा औरंगाबादमधील बैठकीच्या माध्यमातून त्यांनी घेतला.
|