उमरगा - भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. तीन) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास सास्तूर-नारंगवाडी मार्गावरील होळीवाडी (ता. लोहारा) येथे हा अपघात झाला.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी, आकाश दिनकर राठोड (वय 19), आकाश विठ्ठल पवार (वय 19, दोघेही रा. नांदुर्गा तांडा, ता. औसा) व अनिल फुलचंद राठोड (वय 19, रा. नारंगवाडी तांडा, ता. उमरगा) हे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीने गावाकडे जात होते. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी सास्तूरच्या स्पर्श रुग्णालयातील रुग्णवाहिकेतून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना आकाश राठोड व आकाश पवार यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर अनिल राठोड याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी लातूर येथे घेऊन जात असताना त्याचाही वाटेतच मृत्यू झाला.
|