हिंगोली - वसमत तालुक्यात खरीप अनुदानाच्या दोन लाख 83 हजार रुपयांच्या अनियमिततेच्या प्रकरणात वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी या संदर्भात शुक्रवारी (ता.17) आदेश काढले आहेत.
वसमत तालुक्यात 2015 मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईसाठी शासनाने निधी दिला होता. त्यापैकी दोन लाख 83 हजार रुपयांची रक्कम तलाठ्यांच्या खर्चासाठी देण्यात आली होती. ती तलाठ्यांना देण्याऐवजी एका विशिष्ट बॅंक खात्यात जमा करण्यात आली होती. याबाबत आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दोन लाख 83 हजार रुपयांच्या रकमेत अनियमितता झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यानंतर श्री. भंडारी यांनी सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला होता.
त्यावरून श्री. भापकर यांनी तहसीलदार सुरेखा नांदे यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही आदेशात नमूद आहे.
|