नोटाबंदीमुळे पाच कोटी नोकऱ्या गेल्या - अबू आझमी

वाळूज - जोगेश्‍वरी येथील सभेत बोलताना आमदार अबू आझमी.
वाळूज - जोगेश्‍वरी येथील सभेत बोलताना आमदार अबू आझमी.

वाळूज - आमची सत्ता आल्यास एका शहीद सैनिकाच्या बदल्यात दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मुंडके कापून आणण्याची भाषा निवडणूक प्रचारात भाजपने केली होती. त्यामुळे देशहित पाहून मीसुद्धा भाजपला मतदान केले. मात्र सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा मुंडके काय दहशतवाद्याचा साधा एक केससुद्धा आणला नाही. फक्‍त भूलथापा देऊन जनतेला लुटण्याचे काम सरकार करत आहे. नोटाबंदी करून काळा पैसा तर आलाच नाही उलट पाच कोटी नागरिक बेरोजगार झाले, असा आरोप आमदार अबू आझमी यांनी शुक्रवारी (ता. आठ) येथे केला.

वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे श्री. आझमी यांची शुक्रवारी सायंकाळी सभा झाली. यावेळी आझमी यांनी भाजप व शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस सरकारला जनता कंटाळली होती. त्यामुळे भाजपला लोकांनी सत्ता दिली; परंतु त्यांनीही निवडणुकीत जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. विदेशात असलेला काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले. अनेक उद्योग बंद झाल्याने बेरोजगारी वाढली. पाच कोटी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. देशातील श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब आणखी गरीब होत आहेत. सर्वाधिक अन्न उत्पादन करणाऱ्या देशात कुपोषितांची संख्या वाढत आहे. असा आरोप यावेळी आझमी यांनी केला. मेहराज सिद्दिकी, दिनेश यादव, अफजल फारुकी, अयुब खान, माजी सरपंच हारुण चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शेख नजीर, जिल्हाध्यक्ष संजय मिसाळ, काकासाहेब गायकवाड यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com