शोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह

Woman-Toilet
Woman-Toilet

औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी म्हणून शहराचा लौकिक आहे; पण शहरातील प्रमुख भागांत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. एवढेच नाही, तर विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्येही आवश्‍यक त्या प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, त्यांच्या वापराने आजाराची भीती आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि विविध शासकीय कार्यालये, अस्थापनांमध्ये स्वच्छतागृहांचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयाकडे महापालिका आणि सरकारी अधिकारी लक्ष देत नाहीत. शहरात महिलांसाठी तर शोधूनही सार्वजनिक स्वच्छतागृह सापडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

महिला अथवा पुरुष दोघांनाही ठरावीक काळानंतर स्वच्छतागृहात जाणे आवश्‍यकच असते; ही मानवीय गरज आहे. मात्र शहरात अत्यंत तोकडे सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातही महिलांसाठी तर शोधूनही सापडत नाहीत; ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांत तर भयंकर स्थिती आहे. ज्या कार्यालयात स्वच्छतागृह आहे, त्या ठिकाणी पाणी नाही किंवा स्वच्छता केली जात नाही. अनेक कार्यालयांत त्यांची दुरवस्था असल्याने कार्यालयातील कर्मचारी सरळ इमारतीच्या आडोशाचा वापर करतात.

आयकर कार्यालय 
केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत आहे. कार्यालयात येणाऱ्यांसाठीही चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह दोन्ही कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. छावणी आणि सिडकोतील आयकर विभागाचे तीन झोन कार्यालयात हे केंद्रीय कार्यालय असल्यामुळे येथील स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत आहेत. स्वच्छतागृहाची साफसफाई व पाणी व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येते.  

कृषी उत्पन्न बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यासांठी बाजार समितीने दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले आहे. मात्र, त्यांचा शेतकरी वापरच करीत नसल्यामुळे ते कुलूपबंद आहेत. वापर होत नाही एवढ्याच कारणामुळे ते बंद ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीत खते औषध विक्रेत्यांच्या गाळ्यावर; तसेच गाळ्यांच्या बाजूलाच बाजार समितीत येणाऱ्या-जाणाऱ्यांनी स्वच्छतागृह तयार केले आहे. यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. तसेच सर्वजनिक स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांना अडचणीचा सामना करावा लागतो.

आठवडे बाजारात अडचण
शहरातील पीर बाजार, छावणी, चिकलठाणा, जुना मोंढा येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात येणाऱ्यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने सर्वजण उघड्यावर जातात. तीनही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची गरज आहे. आठवडे बाजारात मुख्यत्वे करून महिलांची मोठी अडचण होते. बाजाराच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे लोक उघड्यावर लघुशंका उरकतात. यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी आहे.

७१ टक्के महिला करीत नाहीत वापर 
तीन वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सामाजिक कार्य महाविद्यालय व कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे (आशा केंद्र, पुणतांबा) केलेल्या सर्वेक्षणात ७१ टक्के महिलांनी घराबाहेर स्वच्छतागृहाचा वापरच करीत नसल्याचे सांगितले होते. महिला वर्ग लघुशंकेला जाण्याचा त्रास नको म्हणून पाणीच पिण्याचे टाळतात. पाणी पिण्याचे टाळणे आरोग्याला घातक आहे. यामुळे कामानिमित्त अधिक काळ घराबाहेर राहणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. 

तीन ते चार तासांत लघवीची पिशवी भरते. त्यामुळे तीन-चार तासांत एकदा लघवी केली पाहिजे. जास्तकाळ थांबवून ठेवल्याने इन्फेक्‍शन, पोटात दुखणे, पिशवीची ताकद कमी होणे, नकळत शिंक, खोकला आल्यास लघवी गळण्याचे प्रकार होतात. दाब जास्त झाल्यास त्याचा किडनीवरही परिणाम होतो. स्वच्छ ठिकाणीच लघवी केली पाहिजे. स्वच्छतागृहातील पाणी स्वच्छ असावे. 
- डॉ. विजय दहिफळे, युरोलॉजिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com