औरंगाबाद - गरमपाणी परिसरातील एका पंचवीस वर्षीय तरुणाने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. सहा) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
दीपक विठ्ठल दाभाडे असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून, तो मजुरी काम करीत होता, आणि आई-बहीण, व भावासोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दीपक घरी आला. त्याचा आई व बहिणीसोबत वाद झाला. त्यानंतर तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. त्याची आई व बहीण दुसऱ्या खोलीत झोपले होते. शनिवारी सकाळी दीपक झोपेतून उठला नाही म्हणून आईने त्याच्या खोलीत खिडकीतून डोकावून पाहिले, असता छताला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने डब्यावर डब्बे ठेवून गळफास घेतला होता. हा प्रकार लक्षात येताच आई व कुटुंबीयांनी टाहो फोडला, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दीपकला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
|