निष्पाप मनाचा, हळवा, प्रेमळ 'राजा'

निष्पाप मनाचा, हळवा, प्रेमळ 'राजा'

अननसाचे पार्सल घेऊन आली आगीनगाडी....! मुलांना मुळाक्षरे रंजकतेनं शिकवता यावीत, यासाठी राजा मंगळसुळीकरनं लिहिलेली ही कविता. ती लयबद्ध, तालबद्ध तर आहेच; पण स्वरांशिवाय मुलांना बरंच काही शिकवून जाणारी आहे. 
मंडळी मोठ्यांसाठी कविता स्फुरण जितकं अवघड तितकंच किंबहुना त्यापेक्षा अधिक अवघड बालकविता स्फुरण! अहो, त्यासाठी मुलांच्या विश्‍वात जावं लागतं, तिथं रमाव लागतं. राजाला हे लीलया साधत होतं. कारण कविता स्फुरण्यासाठी तो जीवन जातिवंतपणे जगत होता. तो लहान मुलासारखा निष्पाप मनाचा, हळवा, प्रेमळ होता! या सगळ्यांबरोबरच तो अभ्यासू होता. 

नाही तर मला सांगा, शुगर फॅक्‍टरीत नोकरी करणाऱ्या राजानं सुंदर सुंदर रचना कशा केल्या असत्या? त्याचा आणखी एक गुण म्हणजे तो श्रद्धाळू होता. पंतबाळेकुंद्री महाराजांवर त्याची निस्सीम श्रद्धा होती. त्यांचं शिष्यत्व त्यानं घेतलही होतं आणि महिनोनमहिने बेळगावला महाराजांच्या मठात जाऊन तो राहायचा. तिथे सेवा करायचा, तसेच ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास करायचा. त्याची दुसरी श्रद्धा होती ती कवितेतल्या ज्ञानेश्‍वरावर अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्यावर! अण्णांचा त्याला प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाला होता आणि अभ्यास, आशीर्वाद व श्रद्धेचा त्रिवेणी संगम असा घडला, की राजानं एक अभंग रचला..! 
या ज्ञानाने अज्ञानाला कशी मारली मिठी। 
ज्ञानदा उघडा ही ताठी...। 

अशी वैचारिक रचना करणाऱ्या राजाने अष्टांगाच्या (ग. दि. माडगूळकरांच्या) गीतरामायणातील रचनावर विडंबन लिहिलं अन्‌ माझ्याकडे घेऊन आला. "विशा,' हे घे तुझी अमानत! "कुटुंब रंगले काव्यात...'मध्ये सादर कर! लेका, तुझ्यापेक्षा या रचनांना इतर कोणी न्याय देऊ शकणार नाही..! 
राजाच्या त्या रचना मी "कुटुंब...' मध्ये सादर करतो काय आणि रसिकांची भरभरून दाद मिळते काय, हे प्रत्यय अनुभवल्यानंतर या राजा माणसाने स्टेजवर येऊन मला कडकडून मिठी मारली होती. त्या वेळी त्याचे पाणवलेले डोळे आणि त्याचा गहिवर माझ्यावरचं प्रेम, विश्‍वास, अभिमान, सारं सारं सांगून गेला होता. 
कवितेचा हा प्रेमी.... पण, त्याच हस्ताक्षरही तितकच सुंदर आणि मनही! त्याच्याबद्दल साऱ्यांनाच आपुलकी वाटायची. आमच्या घरी प्रथम आला तेव्हा त्या पहिल्याच भेटीत माझ्या पत्नीचा तो राजाभाऊ बनला आणि माझ्या लेकीचा तन्वीचा तो लाडका राजाकाका बनला. तन्वी त्या वेळी शाळेत शिकत होती. तिला आपल्या सुंदर हस्ताक्षरात राजाकाका पत्र पाठवायचा. त्यात वळणदार अक्षर कसे काढायचे ते लिहायचा. इतक्‍या दिलदार मनाचा कवी आमच्या सुख- दु:खात सोबत राहणारा! एकदा आमच्याकडे आला. स्वत:चं घर आम्हाला घ्यायचे होतं; पण पैशाचे सोंग आणता येत नव्हतं. त्या वेळी त्याने एक कविता करून आम्हाला दिली. 

'कलावंताची पत्नी म्हणजे धोका खूप असतो. आमच्या ह्यांच्यावरून सांगते पण लक्षात कोण घेतो.' 
उमा, ही कविता तुम्ही दोघांनी सादर करायची. 'सई बोल नां काही!' या कार्यक्रमात आम्ही दोघं ही कविता सादर करतो. हसू, आसू आणि टाळ्यांची एकत्रित दाद मिळत जाते. असा आमच्या कुटुंबावर प्रेम करणारा राजा आमच्या सगळ्या समारंभांना आवर्जून यायचा. आम्ही निर्मिलेल्या कवितांच्या रिऑलिटी शोमध्येही सहभागी झाला होता आणि आद्यकवी मुकुंदराज स्मृती पारितोषिक मानकरी ठरला होता. त्यानं लिहिलेलं कार्यक्रम जो आम्हा दोघांवर आहे. त्याचे प्रयोग आम्ही करावे, अशी त्याची फार इच्छा होती; पण राहून गेले ते! आता त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तो करावा लागेल हेच दुर्दैव. 
राजाच्या गीत गीता काव्याच्या ओळी आठवतात. 
जुने वस्त्र ते टाकूनी आपण नूतन भूषवितो। 
तसाच आत्मा पुन्हा जगी या रूप दुजे घेतो। 
अमर असे हा आत्मा जगती शरीर मिथ्यातले। 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com