एका वाहनात १५ ते १७ विद्यार्थी

एका वाहनात १५ ते १७ विद्यार्थी

मुंबई - स्कूल बसपेक्षाही रिक्षा व ओम्नीमध्ये मुले कोंबून आणण्याचा प्रकार धोकादायक आहे. अनेकदा एका वाहनात १५-१७ विद्यार्थ्यांना कोंबले जाते. अशा वाहतुकीवर तत्काळ नियंत्रण आणण्याची गरज आहे. रिक्षा व ओम्नीतून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी कसलेही नियम नाहीत. संबंधितांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या मुलांना कोंबले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोच; पण ओव्हरलोडमुळे अपघात होण्याची भीती असते. रिक्षा व ओम्नी किती वर्षे जुन्या आहेत, याचीही कोणी तपासणी करत नाही. 

मुळात रिक्षा व ओम्नीसारख्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगीच नाही. नियमानुसार कॅनव्हास हूड (छत) असलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करताच येत नाही. बंद स्टील बॉडीच्या वाहनांमधूनच वाहतूक करता येते. त्यामुळे रिक्षांमधून होणारी वाहतूक पूर्णपणे बेकायदा आहे, तरीही त्यावर कारवाई होत नाही. 

ओम्नी व्हॅनमध्ये चालकाशेजारी दोन मुले दप्तरांसह बसवली जातात. चालकामागे समोरासमोर दोन आडव्या सीटवर प्रत्येकी सहा मुले बसवलेली असतात. त्याखेरीज मागच्या सीएनजीच्या टाकीवरही तीन मुले बसवली जातात. रिक्षातही अशाच समोरासमोर दोन सीट टाकून तिथे आठ मुले बसवली जातात. रिक्षाचालकाच्या शेजारीही दोन मुले असतात. रिक्षाच्या दोन्ही बाजूंना दारेही नसतात. विरुद्ध बाजूला आडवी दांडी असते तेवढीच. क्वचित काही ओम्नी गाड्यांना पिवळा रंग असतो. त्यांच्या खिडक्‍यांना जाळ्या असतात. त्यावर स्कूल बस लिहिलेले असते. एखाद्याच गाडीत महिला अटेंडंट असते. मात्र इतर ओम्नीचालक सुरक्षेचे कोणतेही नियम पाळत नाहीत अशी स्थिती आहे. काही काही वाहनचालक तर दुपारी १२.१५ ते १२.३० अशा वेळेत दोन ट्रीप पूर्ण करण्यासासाठी वेगात वाहन चालवतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com