मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढल्याची बाब माहिती अधिकारामुळे (आरटीआय) उघड झाली आहे. 2013 ते 2017 या काळात पाच हजार 56 मुलींचे अपहरण झाले होते.
त्यापैकी 370 मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही; तर चार वर्षांत दोन हजार 839 महिला हरवल्याची नोंद असून, 530 महिला बेपत्ता आहेत.
कौटुंबिक वाद, नैराश्य अशा विविध कारणांमुळे अनेक जण घर सोडतात. अल्पवयीन मुले ही शिक्षणासह कौटुंबिक त्रासामुळे घरातून पळ काढतात; तर अल्पवयीन मुलींना भूलथापा देऊन पळवून नेले जाते.
त्यांची पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली जाते. मुलांच्या बेपत्ता होण्याचे वाढते प्रकार पाहता पोलिसांनी बेपत्ता होण्याच्या नोंदीऐवजी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली. अपहरणाचे गुन्हे दाखल करून ते संबंधित पोलिस ठाण्यास शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शेख यांनी मुंबई पोलिसांकडे शहरातून बेपत्ता होणाऱ्यांबाबत विचारणा केली होती.
अल्पवयीन मुलींचा विचार केला तर चार वर्षांत पाच हजार 56 जणींचे अपहरण झाले असून, 370 जणी बेपत्ता असल्याचे माहिती अधिकारात उघड झाली; तर 18 वर्षांवरील सहा हजार 150 पुरुष बेपत्ता झाले होते. त्यापैकी एक हजार 188 जण बेपत्ता आहेत. 18 वर्षांवरील महिलांमध्ये दोन हजार 839 जणी बेपत्ता होत्या; अद्याप 530 महिलांचा शोध लागलेला नाही.
बदनामीची भीती
अनेक घटनांमध्ये बेपत्ता मुले घरी परतल्यानंतर त्याबाबत पोलिस ठाण्याला माहिती कळवत नाहीत. भूलथापा देऊन पळवण्यात आलेली मुलगी घरी परत आल्यानंतर पोलिस चौकशीसाठी गेल्यानंतर बदनामीच्या भीतीने माहिती देण्यात येत नाही.
चार वर्षांतील अपहरण....
5,056 - अल्पवयीन मुली
6,150 - 18 वर्षांवरील पुरुष
2,839 - 18 वर्षांवरील महिला
|