निवडणुका झाल्या तरी शेतकरी वाऱ्यावर - सावंत

निवडणुका झाल्या तरी शेतकरी वाऱ्यावर - सावंत

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री फक्त निवडणुकीपुरता शेतकऱ्यांचा वापर करतात आणि निवडणुका झाल्या की त्यांना वाऱ्यावर सोडतात, असे दुर्दैवी चित्र सध्या राज्यात दिसत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केली.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले, की दिल्ली दौऱ्यावर जाऊन आपण तूर खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ आणली, असा गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तुरीचे पीक चांगले आले आहे; मात्र तुरीला दर मिळत नाही. "नाफेड'ची बहुतांशी तूर खरेदी केंद्र बंद आहेत. जी केंद्र चालू आहेत, तिथे बारदाने उपलब्ध नाहीत, अशा तऱ्हेची फुटकळ कारणे देऊन तूर खरेदी केली जात नाही. "नाफेड'च्या खरेदी केंद्रांवरही हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे, हे गंभीर आहे.

गेल्या अडीच वर्षांमध्ये अशाच अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकट्या मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यांत 117 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परिस्थिती गंभीर असतानाही सरकारचे डोळे उघडत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी महिनाभरासाठी तूर खरेदीला मुदतवाढ दिली, अशा वल्गना न करता शेतमालाला योग्य भाव मिळेल याकरिता प्रयत्न करावेत, असे सावंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com