मुंबई - दहा वर्षांपूर्वी झालेल्या मालेगाव बॉंबस्फोटात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जाणीवपूर्वक बोगस पुरावे दाखल करून अडकविल्याचा दावा प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
एटीएसने दाखल केलेले पुरावे राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) फेटाळले आहेत, असाही युक्तिवाद पुरोहितच्या वतीने करण्यात आला.
मालेगावमधील बॉंबस्फोटामागे कट्टरतावादी संघटनांचा हात आहे. स्फोटाचा कट पुरोहितच्या संगनमताने आखण्यात आला होता, असा आरोप एटीएसने ठेवला आहे. मात्र, एटीएसनेच नाहक मला या प्रकरणात गोवले आणि बेकायदा डांबून ठेवले, असा आरोप पुरोहितच्या वतीने करण्यात आला. न्या. रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे त्याच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे. साक्षीदाराने संभ्रमित करणारा जबाब दिला असल्याचा आरोपही पुरोहितने जामीन अर्जामध्ये केला आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
|