मुरूडमध्ये महामानवाच्या पाऊलखुणा

मुरूडमध्ये महामानवाच्या पाऊलखुणा

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर अनुयायांसह सत्याग्रह केला. ‘माझ्या लोकांना’ अन्यायाच्या गर्तेतून बाहेर काढायचे, हा निग्रह त्या सत्याग्रहामागे होता. त्या वेळी नबाबी राजवट होती. जंजिरा संस्थानच्या अंमलाखाली रयत होती. त्याच काळात बाबासाहेबांनी संपूर्ण कोकण पालथा घातला. १९३५ च्या एप्रिल महिन्यांत विश्रांतीसाठी ते निसर्गरम्य जंजिरा-मुरूडला आले. हिंदू धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आपली जातीव्यवस्था ही मडक्‍यांच्या उतरंडीसारखी आहे आणि तिथला मोठेपणा हा केवळ जन्मावरच आधारित आहे, गुणावर आधारित नाही, ही सल त्यांना अस्वस्थ करीत असे. अस्पृश्‍यतेचा कलंक मिटवण्यासाठी धर्मांतर अटळ होते. १९३६ मध्ये येवला येथे त्यांनी धर्मांतराची घोषणा केली.

तत्कालीन समाजव्यवस्था विचित्र होती. त्यामुळे बाबासाहेब कोणाच्या घरी मुक्काम न करता डाक बंगल्यात वास्तव्य करीत. मुरूड मुक्कामात त्यांची निवासव्यवस्था हायस्कूलच्या बोर्डिंगमध्ये करण्यात आली. रावबहादूर सी. के. बोले, सुरबानाना चिटणीस, प्राचार्य म. भि. चिटणीस, आचार्य दोंदे ही उच्च समाजातील मंडळी आंबेडकरी चळवळीत हिरिरीने सहभाग घेत असत. त्यापैकी डॉ. म. भि. चिटणीस हे मुरूडचे. एक असामान्य व्यक्तिमत्त्व. चिटणीस हे बाबासाहेबांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांमधील एक. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सावलीसारखी साथ दिली. ‘म.भिं’चे वडील सबनीस आळीमध्ये राहत असत. मोठ्या आदराने त्यांनी बाबासाहेबांना भोजनाचे निमंत्रण दिले. कर्मकांड न पाळणाऱ्या त्यांच्या वडिलांनी परवानगी दिली. चिटणीस कुटुंबीयांसमवेत बाबासाहेबांनी भोजन घेतले, खूप गप्पा-टप्पा झाल्या. एका अर्थी सामाजिक समरसतेची ही नांदी होती; पण मुरूड म्हणजे जणु गारूड. ही वार्ता कर्णोपकर्णी गावभर पसरली. या मूकनायकाचे सवर्णाघरी आगमन लोकांना असह्य झाले. ‘अतिथी देवो भवो’ ही संकल्पना तत्कालीन समाजव्यवस्थेला पचनी कशी पडावी? जाती-पाती मानणाऱ्या समाजाने चक्क चिटणीस कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकला. आश्‍चर्याची बाब म्हणजे चिटणीसांकडे घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीनेही काम सोडून त्यांचे घर टाकले! प्रसंग बाका असला तरी चिटणीस डगमगले नाहीत. पुढे गणपती सणापर्यंत हा बहिष्कार जारी असल्याची आठवण स्व. म. य. दळवी तथा बाबा दळवी यांचे अनुयायी शरद चिटणीस यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितली. मुरूडच्या अल्पशा वास्तव्यात ग्रंथलुब्ध डॉ. आंबेडकरांनी जनरल लायब्ररीला भेट देऊन ग्रंथसंपदेची वाखाणणी केल्याची याद बुजुर्ग सांगतात. त्यांच्या मुरूड भेटीच्या प्रेरणेतून मुरूड तालुका बौद्धजन सेवा मंडळाने मुरूड शहरात बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com