भिवंडी - महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली, अशा वक्तव्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज गैरहजर होते. या प्रकरणी 23 एप्रिलला पुढील सुनावणी होईल, अशी माहिती वकील नारायण अय्यर यांनी दिली. पक्षाच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते सुनावणीसाठी येणार नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
न्यायाधीश एल. एम. पठाण यांच्या न्यायालयात ऍड. अय्यर यांनी अर्ज दाखल केला. तो मंजूर करण्यात येऊन 23 एप्रिलला पुढील तारीख निश्चित करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश सुधीर बर्डे यांच्याकडे होती; मात्र ते आज रजेवर होते. त्यामुळे न्यायाधीश पठाण यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडीतील सोनाळे गावात राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली होती. त्या वेळी महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली होती, असा खळबळजनक आरोप केला होता. या प्रकरणी संघाचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या खटल्यात यापूर्वी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. केवळ वृत्तपत्राच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला, अशी बाजू राहुल गांधींच्या वकिलाने मांडली होती. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश कुंटे यांच्या वतीने ऍड. गणेश धारगलकर यांनी बाजू मांडली.
|