मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर फुटीच्या भीतीने शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपबरोबर आतापर्यंत झालेल्या वादामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवक युती न करण्याची भूमिका "मातोश्री'कडे मांडू लागले आहेत. विशेष म्हणजे महापौर नाही झाला तरी चालेल; पण भाजपची संगत नकोच, अशी त्यांची टोकाची भूमिका असली तरी त्यावर "पाहूया' एवढीच प्रतिक्रिया पक्षप्रमुख देत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेत दोन मतप्रवाह झाले. दरम्यान, शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही तर फूट पडण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेनेने मिळालेल्या मंत्रिपदांवर समाधान मानून खेरीस भाजपला पाठिंबा दिला; मात्र मंत्रिपदाचे अपेक्षित फायदे शिवसेनेच्या नेत्यांना मिळत नसल्याने सत्तेत राहूनही त्यांची नाराजी वाढली आहे. यातून धडा घेऊन आता युती नकोच, अशी भूमिका शिवसेनेचे नगरसेवक मांडत आहेत. प्रचारात भाजपने आमच्या सर्वोच्च नेत्यांवर आरोप केले आहेत. आता आम्ही वेगळे लढून निवडून आलो आहोत. परत त्यांच्याबरोबर गेलो तर मतदार नाराज होतीलच. पुन्हा विधानसभेत वेगळे लढायचे असल्याने मतदारांकडे कसे जाणार, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नगरसेवकाने व्यक्त केली.
पालिकेचा निकाल जाहीर झाल्यापासून नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास सुरुवात केली. त्यात काही ज्येष्ठ नगरसेवक भाजपबरोबर आता युती नको. महापौर नाही झाला तरी चालेल, अशी भूमिका मांडत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, हे विसरून आम्ही त्यांच्यासोबत एकत्र येऊ शकत नाही, अशी भूमिकाच काही नगरसेवकांनी मांडली असली तरी "पाहूया, वेळ आल्यावर बोलेन' एवढीच प्रतिक्रिया उद्धव ठाकरे देत आहेत.
|