पेट्रोल दरवाढ करून त्याच्यावरच भाजपने आपले सरकार चालवले आहे - जयंत पाटील 

vajreshwari
vajreshwari

वज्रेश्वरी - भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जवळपास २० ते २५ रुपायांपर्यंतची पेट्रोलची दरवाढ केंद्र शासनाने केली आहे. पेट्रोल दरवाढ करून त्यातून पैसे मिळविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. पेट्रोलची सततची दरवाढ करूनच भाजपने आपले सरकार चालविले आहे. 

चार वर्षे पेट्रोलची दरवाढ करून शेवटच्या चार महिन्यात आता अडीच अडीच रुपयांनी पेट्रोल स्वस्त केले आहे. पेट्रोल दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादीने गांधी जयंती दिनी राज्यभर आंदोलन केले आहेत. मात्र पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त केल्याने भाजप सरकारने कोणतीही मोठी कामगिरी केली नाही. चार वर्षात २० ते २५ रुपयांची दरवाढ करून फक्त अडीच अडीच रुपये पेट्रोल स्वस्त केल्याने भाजप सरकारने जनतेची थट्टाच केली आहे. अशी खरमरीत टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भिवंडीत आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भिवंडीतील हॉटेल रिजेन्ट गार्डन येथे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभागाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दीकी, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, भिवंडी शहर अध्यक्ष खालिद गुड्डू, भिवंडी शहर महिला अध्यक्षा स्वाती कांबळे, भगवान टावरे, अनिल फडतरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अदानी, अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याची टिका माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी याप्रसंगी केली. भाजप सरकारची नोटबंदी, जीएसटी यांसारख्या फसव्या धोरणांमुळे देश दहा वर्षांनी मागे पडला असून राज्यावर ५ लाख करोड रुपयांचे कर्ज भाजप सरकारच्या केवळ चार वर्षांच्या काळात झाले असल्याची माहिती देखील याप्रसंगी बोलतांना गणेश नाईक यांनी दिली. दरम्यान मोदींच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी दिसत नसल्याने मोदींवर मला दया येते अशी टिकात्मक खंत देखील नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वतीने किमान एक तरी उमेदवार भिवंडीतून निवडणूक रिंगणात उतरवावा अशी मागणी याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली. या मागणीला उत्तर देताना कार्यकर्त्यांनी एक महिन्याच्या आत भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा क्षेत्रात बूथ प्रमाणे संघटना तयार करावी व त्याचा सकारात्मक अहवाल एक महिन्याच्या आत आपल्याला मिळाला तर निश्चितच आपण पक्षश्रेष्ठींकडे या बाबतची चर्चा करून त्यावर मार्ग काढू असे आश्वासन याप्रसंगी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले. 

दरम्यान "प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचा आपण पालन करणार असून एका महिन्याच्या आत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बूथ निहाय संघटना तयार करू" असे आश्वासन याप्रसंगी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com