मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केले.
उपाध्ये म्हणाले, की निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला जाहीरनामा सांगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मतदारसंघातील प्रचारात भाजपच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे मांडले. या मुद्द्यांचे सूतोवाच त्यांनी निवडणुकीपूर्वीही केले आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रतिनिधीची तक्रार चुकीची आहे.
ते म्हणाले, की पालघरच्या प्रचारात जनतेच्या प्रतिसादावरून हे स्पष्ट झाले आहे, की भाजपाचाच उमेदवार विजयी होईल. मुख्यमंत्र्यांच्या सभेत याची खात्री पटली. त्यामुळे निराश झालेले विरोधक निरर्थक मुद्दे काढून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मतदार कोणत्याही प्रकारे विचलित होणार नाहीत व विकासाच्या मुद्द्यावरून भाजपलाच पाठिंबा देतील.
|