मुंबई ः निवडणुकांच्या वातावरणात शिवसेना-भाजपा युतीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, त्या वेळी मनसे "फॅक्टर' हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- मनसे एकत्र येणार, अशी आवई उटली असून, दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप ठोस काहीच समोर आले नसल्यामुळे "मनसे संम्रभ कायम' आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापुढे कोणतीही निवडणूक भाजपबरोबर युती करून लढणार नाही, अशी घोषणा करून भाजपबरोबरची युती तोडली. यानंतर लगेच शिवसेना आणि मनसे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केलेल्या विधानांनी पाठबळ मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र', असे विधान केले, तर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर या दोन भावांनी एकत्र यावेत, या मताची जाहीर चर्चा करतात. शिवसेनेकडून याबाबत खंडन केले असले तरी, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे गोव्यातील वक्तव्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे.
"युतीबाबत अद्याप मनसेचा प्रस्ताव आला नाही', असे विधान केले आहे, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पुण्यात या दोन बंधूंच्या एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसे संम्रभ कायम आहे.
|