मुंबई - गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राज्यकर्ते चुकीचे निर्णय घेत असल्याने महिलांना त्रास सोसावा लागतो, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात केली.
महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विभागातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्या वेळी ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर सडकून टीका केली. केंद्राच्या नोटाबंदीमुळे सर्वांत जास्त त्रास महिलांनाच सहन करावा लागला आहे. वर्सोवा येथील आमदार व नगरसेवकांचे येथील समस्या सोडवण्याकडे लक्षच नाही. समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी ते पोस्टरबाजी करून आपापसात स्पर्धा करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक वर्षांपासून येथील प्रसूतिगृहाची दुरवस्था झाली आहे. वाहतूक कोंडी तर नित्याचीच झाली आहे. वर्सोवा ग्रामस्थांना बांधकामांवरून अधिकारी त्रास देतात. या समस्यांबद्दल कुणीही चकार शब्द काढत नाही, अशी टीका त्यांनी केली.
मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी हा मेळावा घेतला. या वेळी शिरीष सावंत, प्रवीण दाभोळकर, प्रमोद पाटील आदी पदाधिकारी हजर होते.
|