मुंबई - गोवंडी, बैंगनवाडीतील महापालिकेच्या उर्दू शाळेत गेल्या आठवड्यात देण्यात आलेली फॉलिक ऍसिडची (लोह) गोळी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या चांदनी शेख या सहावीतील मुलीचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. संसर्गामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला, तरी पालकांत गोळ्यांबाबत मोठा गोंधळ उडाला.
याच भागातील दुसऱ्या पालिका शाळांमध्ये शुक्रवारी जंतुनाशक गोळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांसह राजावाडी रुग्णालयात धाव घेतली. महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय योजनेंतर्गत ही दोन्ही औषधे शाळांमध्ये दिली जातात. पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये दर आठवड्याला फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. चांदनीला संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे; मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होईल.
संजयनगरमधील उर्दू शाळा क्रमांक दोनमधील चांदनीला गेल्या आठवड्यात ही गोळी खाल्ल्यानंतर पोट आणि छाती दुखण्याचा त्रास होऊ लागला. तिला तापही आल्याने परिसरातील डॉक्टरांनी उपचार केले होते, असे पालकांनी सांगितले. सोमवारी (ता. 6) पुन्हा शाळेतून दिलेली गोळी तिने खाल्ली नाही. मंगळवारी (ता.7) पुन्हा त्रास होऊ लागल्याने ती शाळेत गेली नाही. त्यानंतर दोन दिवस ती शाळेत गेली. आज सकाळी तिला रक्ताची उलटी झाल्याने तत्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हलविले; पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
विद्यार्थ्यांना पोटदुखी
जंतूनाशक दिनानिमित्त शुक्रवारी पालिका शाळांत वाटलेल्या गोळ्या खाल्ल्यावर काही विद्यार्थ्यांनी पोटदुखीची तक्रार केली. दोन शाळांमधून राजावाडी रुग्णालयात तब्बल 350 विद्यार्थ्यांना आणण्यात आले. त्यातील 17 जणांना तेथे दाखल केले; तर 36 जणांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
या विद्यार्थिनीने गोळी खाल्ल्यानंतर काही दिवसांनी मृत्यू झाला आहे. त्यामुळे इतर शाळांमध्ये औषधांचा पुरवठा नियमित सुरू राहणार आहे.
- महेश पालकर, पालिका शिक्षणाधिकारी
|