मुंबई - जिल्हा परिषदांत सत्ता मिळवा. त्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक ते निर्णय घ्या; मात्र दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी असलेले वाद विसरून सत्तेसाठी वाट्टेल ते करू नका, असा आदेश "मातोश्री'वरून शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी (ता. 21) होणाऱ्या निवडणुकांचा फड चांगलाच रंगणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी सर्वच पक्षांच्या अनपेक्षित युत्या-आघाड्या होणार आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेस अनेक ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. कॉंग्रेसबरोबर युती करण्यास हरकत नाही; मात्र सिंधुदुर्गातील कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्याशी असलेले वाद विसरू नका. त्याच आधारावर राज्यात युतीचे समीकरण जुळवा, असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.
विकासासाठी सत्ता महत्त्वाची आहे. त्यासाठी युती-आघाडी करता येते, हे भाजपनेही दाखवून दिले आहे. मग शिवसेनेने हे केल्यास काय हरकत आहे, असा प्रश्न शिवसेनेच्या एका नेत्याने विचारला. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदांसाठी शिवसेना-भाजप निवडणुकीपूर्वी युती झाली नव्हती. त्यामुळे सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी आता दोन्ही पक्ष मोकळे आहेत. या वेळी सर्वच पक्षांनी भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना काही ठिकाणी कॉंग्रेसला मदत करण्याची शक्यता आहे.
|