केंद्राचे दुर्लक्ष; समुद्राची गटारगंगा
मुंबई - समुद्राची गटारगंगा झाल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत उघड झालेले असतानाही दीड वर्षापासून केंद्र सरकारने मलजल प्रक्रिया केंद्राचे निकष ठरवले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या लालफितीच्या कारभारामुळे मुंबईतील सहा केंद्रांचे काम रखडले आहे.
महापालिकेने कुलाबा येथील मलजल केंद्राच्या विस्ताराचे काम सुरू केले. यात मलजलावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त वापरण्यासाठी योग्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य सहा केंद्रांची क्षमता वाढवून तेथे उच्च दर्जाचे प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार होते; मात्र केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने देशभरातील मलजल केंद्रासाठी सुधारित निकष तयार करण्याचा निर्णय घेतला. हे निकष दीड वर्षापासून ठरलेले नाहीत. त्यामुळे इतर प्रक्रिया केंद्राचे काम सुरू करता येत नाही, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भांडुप आणि घाटकोपर येथील प्रक्रिया केंद्रासाठी पालिकेने निविदाही मागवल्या होत्या, तर वरळी आणि वांद्रे प्रक्रिया केंद्राच्या निविदांचा मसुदा तयार करण्यात आला होता. नवे निकष ठरविण्यात येणार असल्याचे या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे.
मलजलावर प्रक्रिया करणे हा स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग आहे; मात्र केंद्र सरकारच निकष ठरवत नसल्याने हे काम रखडले असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनाही प्रतिसाद नाही
मुंबई आणि राज्यातील सर्वच महानगरपालिकेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे काम रखडल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यासाठी त्यांनी पाच वेळा दिल्लीत जावून पाठपुरावा केला; मात्र पर्यावरण विभागाने मुख्यमंत्र्यांनाही दाद दिली नसल्याचे समजते.
मुंबईचे समुद्र गटारासारखे
पाण्याचा दर्जा वॉटर क्वालिटी इंडेक्सनुसार ठरवला जातो. मुंबईतील समुद्रातील पाण्याचे वॉटर क्वालिटी इंडेक्स 30 ते 50 एककादरम्यान आहे. म्हणजेच समुद्राचे पाणी खराब असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चाचणीत आढळून आले आहे. नरिमन पॉईंट, वरळी, माहीम, जुहू येथील पाण्याचे नमुने घेण्यात आले होते, तर मिठी नदी ही अतिदूषित असल्याचे या पाहणीत आढळून आले आहे.
पंपिंग स्टेशन सध्याची परिस्थिती आणि प्रस्तावित
पंपिंग स्टेशन - प्रस्तावित क्षमता (दशलक्ष लिटर) - सध्याची (दशलक्ष लिटर)
कुलाबा- 37-37
वरळी- 493-745
वांद्रे- 826-635
वेसावे- 227-115
847-120
भांडुप- 215-145
घाटकोपर- 337-195
एकूण- 2982-1992
|